ऑनलाईन टीम / मुंबई :
परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व इतर राज्यातील नागरिकांना वंदेभारत अभियानांतर्गत मुंबईत उतरवून घेऊन त्यांना क्वारंटाइन कारण्याचे काम सातत्यपूर्ण रितीने सुरुच असून आतापर्यंत 193 विमानांनी 29 हजार 850 नागरिक मुंबईत दाखल झाले आहेत.
यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या 10 हजार 845 आहे, उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 1,02,246 आहे तर इतर राज्यातील 8759 प्रवासी ही आतापर्यंत मुंबईत दाखल झाले आहेत. राज्यात 15 जुलैपर्यंत आणखी 56 विमानांनी प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.
दरम्यान, आतापर्यंत विविध देशातून प्रवासी आले आहेत. यामध्ये ब्रिटन, सिंगापूर, फिलीपाईन्स, अमेरिका, बांगलादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया, स्पेन, आर्यलँड, कतार, हाँगकाँग, कझाकीस्तान, मॉरिशियस, ब्राझील, थायलंड, केनिया, मियामी, व्हियतनाम, इटली, स्विडन, इथोपिया,रोम, जर्मनी, दुबई, मालावी, वेस्टइंडिज, नॉर्वे, कैरो, युक्रेन, रशिया, मादागास्कर, नायजेरिया, ऑस्ट्रेलिया, न्युझिलंड, सौदीअरेबिया, कॅनडा, पुर्वअफ्रिका, फ्रान्स, नैरोबी,न्युयार्क, जॉर्जिया, कामेरुन, या देशांचा समावेश आहे.
बृहन्मुंबईतील प्रवाशांसाठी संस्थात्मक क्वारंटाइनची सुविधा विविध हॉटेल्समध्ये करण्यात आली आहे. इतर जिल्ह्यातील व राज्यातील प्रवाशांना त्यांच्या जिल्हा मुख्यालयी पाठविण्याचे काम जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. हे प्रवासी त्यांच्या जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्या जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांमार्फत त्यांना क्वारंटाइन करण्याचे काम केले जाते.
वंदेभारत अभियान केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालय, विदेश मंत्रालय व केंद्रीय गृह मंत्रालय यांच्या समन्वयाने महाराष्ट्र शासन यशस्वीरित्या पार पाडत आहे.