प्रतिनिधी/ बेळगाव
तेलंगणा राज्यातील पिड्डापल्ली येथे वकील दांपत्याचा निर्घृण खून करण्यात आला. यामुळे संपूर्ण वकीलवर्गाला धक्का बसला आहे. अशा प्रकारे वकिलांवर हल्ले होत असतील तर वकिलांनी काम कसे करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा घटनांमुळे आता वकिलांना संरक्षण द्यावे तसेच कायदाही कठोर करावा, अशी मागणी बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने हे निवेदन देण्यात आले. तेलंगणा राज्यातील पिड्डापल्ली येथील ऍड. गट्टू वामन राव आणि त्यांची पत्नी पी. व्ही. नागमणी यांचा खून करण्यात आला आहे. वकिलांना न्यायालयामध्ये कायद्यानुसार काम करावे लागते. मात्र, काही जण वकिलांवरच राग काढत आहेत. अशा घटना वारंवार घडत आहेत. पती-पत्नीचा खून झाला ही बाब अत्यंत गंभीर आहे. यामुळे संपूर्ण देश हादरला आहे.
अशा प्रकारे हल्ले होत असतील तर आम्हाला काम करणे कठीण जाणार आहे. तेव्हा वकिलांना संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, ऍड. मोहन माविनकट्टी, ऍड. प्रवीण करोशी, ऍड. अमृत कोल्हटकर, ऍड. उमेश बिडीकर, ऍड. शिवाजी शिंदे, ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. नितीन बी. गंगाई, ऍड. प्रभू यतनट्टी, ऍड. पी. एन. रजपूत, ऍड. एम. के. कांबळे, ऍड. रेहमान नदाफ, ऍड. बसवराज पट्टणशेट्टी, ऍड. दीपक औरादकर, ऍड. प्रकाश होंडाई यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.