सदर जागा इनामदार बंधूंची; महापालिका अथवा वक्फ बोर्डाचा कोणताच मालकी हक्क नाही, पत्रकार परिषदेत माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
कांदा मार्केट जागेच्या मालकी हक्काचा वाद उच्च न्यायालयात सुरू आहे. इनामदार बंधू आणि महापालिका यांच्यामधील वाद सुरू असतानाच सदर जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा बाग सिकंदर दर्गा आणि कर्नाटक राज्य वक्फ बोर्डने केला होता. मात्र सदर दावा दिवाणी न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे सदर जागा इनामदार बंधूंची असून, महापालिका अथवा वक्फ बोर्डचा कोणताच मालकी हक्क नाही, अशी माहिती दि न्यू कांदा मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष माजी नगरसेवक लतीफखान पठाण यांनी दिली.
जागेच्या मालकी हक्काबाबत कर्नाटक राज्य वक्फ बोर्ड आणि बाग सिकंदर दर्गा यांनी पहिले अतिरिक्त वरि÷ दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल 23 फेब्रुवारी रोजी लागला असून सदर दाव्याचा निकाल इनामदार बंधूंच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे याबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लतिफखान पठाण बोलत होते. सदर जागा इनामदार यांच्या मालकीची असून, महापालिकेला लीज कराराने दिली होती. या लीज कराराची मुदत संपली आहे. मात्र जागेच्या कागदपत्रावर महापालिकेचे व वक्फ बोर्डाने आपले नाव दाखल केले होते. तसेच सदर जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा दोन्ही संस्थांनी केला होता. मात्र वक्फ बोर्डने दाखल केलेल्या दाव्याचा निकाल इनामदार बंधूंच्या बाजूने लागला आहे. त्यामुळे या जागेवर वक्फ बोर्डचा कोणताच अधिकार नाही, हे सिद्ध झाले आहे.
मनपाने मालकी हक्क गाजवल्यास अवमान याचिका दाखल करू
यापुढे महापालिका किंवा वक्फ बोर्डने या जागेवर कोणताच अधिकार गाजवू नये, तसेच येथील गाळे भाडेतत्त्वावर देण्याच्या दृष्टीने महापालिकेने कोणतीच जबरदस्ती करू नये, अन्यथा न्यायालयात अवमान याचिका दाखल करू, असा इशारा लतिफखान पठाण यांनी दिला.
इनामदार बंधूंच्या विरोधात घातलेला दावा पूर्णपणे फेटाळला आहे. न्यायालयाने इनामदार बंधूंच्या बाजूने निकाल दिला असून, मालकी हक्क इनामदार बंधूंचाच आहे. त्यामुळे या ठिकाणी मालकी हक्क घेऊन गाळे भाडेतत्त्वावर देण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयात दावा दाखल करू, असे सांगून दाव्याची संपूर्ण माहिती ऍड. एस. जी. काकतकर यांनी दिली.