शेवटच्या कसोटीत फलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय, तिसरी कसोटी दोनच दिवसात निकाली झाल्याने खेळपट्टीवरुन वादंग
वृत्तसंस्था / अहमदाबाद
येथील गुलाबी चेंडूवर खेळवली गेलेली भारत-इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी अवघ्या दोनच दिवसात निकाली झाल्यानंतर खेळपट्टीवर बऱयाच प्रमाणात टीका होत आली आहे. त्या पार्श्वभूमीवर, आयसीसीची वक्रदृष्टी टाळण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सक्रिय झाल्याचे संकेत आहेत. गोपनियतेच्या अटीवर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उभय संघातील चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यात फलंदाजांना पोषक खेळपट्टी उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
4 कसोटी सामन्यांच्या या मालिकेत भारतीय संघ 2-1 फरकाने आघाडीवर असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमधील स्थान निश्चित करण्यासाठी भारताला इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी अनिर्णीत राखली तरी पुरेसे ठरणार आहे. ही फायनल दि. 18 ते 22 जून या कालावधीत ऐतिहासिक लॉर्डस मैदानावर खेळवली जाणार आहे. अर्थात, या पार्श्वभूमीवर, इंग्लंडविरुद्ध सध्या सुरु असलेल्या मालिकेतील शेवटची कसोटी भारतासाठी महत्त्वाची असल्याने बीसीसीआय आणखी एक ‘टर्निंग ट्रक’ उपलब्ध करुन देण्याचा धोका स्वीकारणार नाही, अशी चिन्हे आहेत.
‘मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यासाठी चेंडू उत्तम उसळेल, अशी कठीण पृष्ठभागाची खेळपट्टी उपलब्ध करुन दिली जाईल आणि फलंदाजांना त्यावर सहज फटकेबाजी करता येईल. हा सामना लाल चेंडूवर खेळवला जाणार असल्याने मोठय़ा धावसंख्येचे डोंगर रचले जाणे पाहता येऊ शकते’, असे बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सूत्राने गोपनियतेच्या अटीवर नमूद केले. अहमदाबादमधील या नुतनीकरण केल्या गेलेल्या खेळपट्टीवर आयपीएल तसेच आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतील बरेच महत्त्वाचे सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळे देखील चौथ्या कसोटीत खेळपट्टी कशा स्वरुपाची असेल, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
‘दोन सामने एकाच मैदानावर खेळवले जात असताना केवळ एकाच सामन्यातील निकालावर खेळपट्टीचे स्वरुप ठरवणे चुकीचे ठरु शकते. या मैदानावरील दुसरी कसोटी झाल्यानंतर सामनाधिकारी जावगल श्रीनाथ आपला अहवाल सादर करतील व आयसीसी त्यावर आधारित कार्यवाहीची दिशा ठरवू शकेल. तूर्तास, इंग्लंड संघाने खेळपट्टीबद्दल कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही’, असे बीसीसीआयमधील या वरिष्ठ सूत्राने नमूद केले.
जर एखाद्या स्टेडियममधील एक खेळपट्टी उत्तम असेल व दुसरी खेळपट्टी खराब निघत असेल तर अशा परिस्थितीत आयसीसी त्यावर काहीही कारवाई करण्याची शक्यता कमी आहे. भारतीय संघ 3-1 फरकाने मालिका जिंकल्यास आणखी खुश असेल. पण, शेवटचा सामना बरोबरीत राखणे देखील पुरेसे असल्याने टर्नर ट्रकची तितकी आवश्यकता नाही, यावर बीसीसीआयमध्ये एकमत असल्याचे मानले जाते.
संघरचनेचीही उत्सुकता
चौथ्या व शेवटच्या कसोटीत स्पीडस्टार जसप्रित बुमराह खेळणार नसल्याने गोलंदाजी लाईनअप कशी असेल, याबद्दलही उत्सुकता असणार आहे. इशांत शर्माचा साथीदार म्हणून उमेश यादवपेक्षा मोहम्मद सिराजला संधी मिळण्याची शक्यता अधिक मानली जाते. तिन्ही फिरकीपटूंना सहज संधी मिळेल, असाही होरा आहे.
काय सांगतो आयसीसीचा नियम?
आयसीसीच्या नियमावलीप्रमाणे अशी खेळपट्टी खराब स्वरुपात गणली जाते, जेथे फलंदाज व गोलंदाज यांच्यात संतुलित खेळच होऊ शकत नाही. जर खेळपट्टी फक्त फलंदाजांनाच अनुकूल असेल, जर खेळपट्टीकडून गोलंदाजांकडून काहीच मदत मिळत नसेल, किंवा चेंडू जास्त स्पिन किंवा सीम होत असेल तसेच उलट स्थितीत फलंदाजांना धावाच जमवता येत नसेल तर अशा प्रकारची खेळपट्टी खराब स्वरुपाची मानली जाते. खेळपट्टीवर चेंडू खूपच वळत असेल तर अशा खेळपट्टीला देखील खराब गणले जाते.
भारतीय उपखंडातील खेळपट्टय़ांवर फिरकी गोलंदाजीला पोषक स्थिती असते. येथे काही दिवस चेंडू उत्तम वळतो. पण, चेंडू अनपेक्षितरित्या उसळून वर येत असेल व त्याच खेळपट्टीवर काही चेंडू अचानक खाली रहात असेल तर अशी खेळपट्टीही खराब श्रेणीत येते. खेळपट्टी खराब असल्याचे स्पष्ट होत असेल व यामुळे सदर स्टेडियमच्या खात्यावर 5 डिमेरिट गुण होत असतील तर अशा स्टेडियमला आयसीसी एका वर्षासाठी निलंबित करु शकते.
बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार नाही
जलद गोलंदाज जसप्रित बुमराह इंग्लंडविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नसल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. वैयक्तिक कारणास्तव त्याची संघातून मुक्तता केली असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले.
‘वैयक्तिक कारणास्तव चौथ्या कसोटी संघातून आपल्याला मुक्त करावे, अशी विनंती बुमराहने केली होती. त्यानुसार, आम्ही त्याला संघातून मुक्त केले. तो शेवटच्या कसोटीत निवडीसाठी उपलब्ध असणार नाही’, असे बीसीसीआय सचिव जय शाह यांनी म्हटले आहे.
बुमराहला मर्यादित षटकांच्या मालिकेतून यापूर्वीच विश्रांती दिली गेली आहे. 5 टी-20 व 3 वनडे सामन्यांचा समावेश असलेल्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होत आहे. 27 वर्षीय बुमराह ऑगस्टपासून बायो-बबलमध्ये असून आयपीएलनंतर तो थेट ऑस्ट्रेलियाला रवाना झाला होता. सध्या इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेत चेन्नईतील पहिल्या कसोटीत बुमराहने 4 बळी घेतले, ती कसोटी भारताने 227 धावांनी गमवावी लागली होती. त्यानंतर चेन्नईमधीलच दुसऱया कसोटीत बुमराहला विश्रांती दिली गेली होती, ती कसोटी भारताने 317 धावांनी जिंकली होती. त्यानंतर तिसऱया कसोटीत भारताने दोनच दिवसात विजय संपादन केला, त्यात बुमराहला फक्त 6 षटके गोलंदाजी करता आली. फिरकीला पोषक खेळपट्टीवर तो एकही बळी घेऊ शकला नव्हता.
असा आहे खराब खेळपट्टय़ांचा इतिहास
यापूर्वी 2018 मध्ये भारत-द. आफ्रिका यांच्यातील मालिकेदरम्यान जोहान्सबर्गमधील खेळपट्टी खराब ठरवली गेली होती. त्या खेळपट्टीवर चेंडूचा अनियमित टप्पा टीकेचे लक्ष्य ठरला. तेथे काही चेंडू अचानक उसळून वर येत राहिले तर काही चेंडू अचानक खाली रहात गेले. या अनियमित खेळपट्टीमुळे खेळही थांबवावा लागला. 2017 मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पुणे कसोटीत देखील खेळपट्टी टीकेचे लक्ष्य ठरली. अर्थात, त्या लढतीत स्टीव्ह स्मिथने शतक झळकावले तर उमेश यादवने 4 बळीही घेतले होते. अहमदाबाद कसोटीचा विचार करता, येथे जलद गोलंदाजांना 30 पैकी केवळ 2 बळी मिळाले. 28 बळी फिरकीपटूंनी घेतले तर त्यातील 17 फलंदाज एकाच दिवशी बाद झाले.
इंग्लिश प्रसारमाध्यमांमध्ये ‘फिफ्टी-फिफ्टी’!
जो रुटच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाला भारताविरुद्ध अवघ्या दोनच दिवसात नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागल्यानंतर इंग्लिश प्रसारमाध्यमांमध्ये याच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काही माध्यमांनी इंग्लिश खेळाडूंवर टीका, ईसीबीच्या रोटेशन पॉलिसीवर टीका केली तर काही माध्यमांनी खेळपट्टीच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. द टेलिग्राफचे स्तंभलेखक सीक्लड बेरी यांनी आयसीसीने मोदी स्टेडियमवरील ती खेळपट्टी 12 ते 24 महिन्यांकरिता निलंबित ठेवावी आणि भारताला मानांकनातील गुणात दंड लागू करावा, अशी सूचना आपल्या स्तंभातून मांडली. आयसीसीकडे इतके धारिष्टय़ आहे का, याबद्दल आपल्याला साशंकता असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
‘द सन’ दैनिकाने इंग्लिश व्यवस्थापनाने राबवलेल्या रोटेशन पॉलिसीवर या अपयशाचा ठपका ठेवला. विस्डेनने ‘इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील हा सर्वात खराब संघ असेल’, असे म्हटले. द मिररने मात्र खेळपट्टीवर टीका केली. मोटेराची खेळपट्टी ही कसोटी क्रिकेटला पोषक खेळपट्टी म्हणता येणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
बीसीसीआयसमोर आयसीसीचे काहीही चालत नाही, हे आणखी एकदा सिद्ध होताना दिसून येत आहे. बीसीसीआय आपल्याला पोषक खेळपट्टी करवून घेऊन सामने जिंकत आहे आणि दुर्दैवाने आयसीसी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. वास्तविक, इतकी खराब खेळपट्टी दिल्याबद्दल भारताचे मानांकनातील गुण कापायला हवेत.
-इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन
झ्या मते, तिसऱया कसोटी सामन्यासाठी उपलब्ध करुन दिलेली खेळपट्टी कसोटी क्रिकेटसाठी अजिबात योग्य नव्हती. या खेळपट्टीवर अगदी भारतीय संघाचा पहिला डाव देखील 145 धावांमध्ये गुंडाळला गेला होता, त्यावरुन त्याची उत्तम कल्पना येईल.
-माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण
मोटेराची खेळपट्टी खराब होती, याबाबत माझ्या मनात किंचीतही शंका नाही. इंग्लंडने पहिल्या डावात 200 धावा फलकावर लावले असते तरी भारतीय संघ अडचणीत येऊ शकला असता. अर्थात, ही खेळपट्टी दोन्ही संघांसाठी एकच होती, हे लक्षात घ्यायला हवे.
-माजी ऑफस्पिनर हरभजन सिंग
एखादा कसोटी सामना 2 दिवसातच संपतो, हे कसोटी क्रिकेटसाठी देखील भूषणावह नाही. अशा खेळपट्टय़ांवर अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांनी गोलंदाजी केली असती तर त्यांनी किमान 1000 व 800 बळी मिळवले असते.
-माजी अष्टपैलू युवराज सिंग
खेळपट्टीवर टीका करण्याऐवजी मी अक्षर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी जो भेदक मारा केला, त्यांचे विशेष अभिनंदन करेन. दोन्ही संघांसाठी एकच खेळपट्टी होती. त्यात ज्या संघाने सरस खेळ साकारला, तोच संघ विजयाचा हक्कदार ठरला.
-माजी कर्णधार सुनील गावसकर
माझ्या मते, खेळपट्टी आव्हानात्मक होती. पण, ती इतकीही कठीण नव्हती की, जेथे फलंदाजीच करता येणार नाही. इंग्लंडने पहिल्या डावात 112 धावा केल्या. यापेक्षा अधिक धावा ते जमवू शकले असते.
-इंग्लंडचा माजी कर्णधार माईक आर्थरटन
खेळपट्टी कशा पद्धतीची असावी, याबद्दल काहीही नियम नाहीत आणि तिसऱया कसोटीत ज्यावेळी केवळ दोनच दिवसात सामना निकाली झाला, त्यावेळी इंग्लंडने नाणेफेक जिंकली होती आणि त्यांनीच प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता, हे विसरुन चालणार नाही.
-ज्येष्ठ समालोचक जेफ्री बायकॉट