प्रतिनिधी/ खानापूर
बुधवारपासूनच खानापुरातील बाजारपेठेत वटपौर्णिमेच्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू झाली आहे. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आपल्या पतीराजाना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य प्राप्त व्हावे म्हणून सुवासिनी महिलांकडून हे व्रत केले जाते. त्यामुळे वटपौर्णिमेसाठी लागणारे पानांचे वाण, मनी मंगळसूत्रे, हिरवी काकणे, हळदी-कुंकवाच्या पुढय़ा, वडाला गुंडाळण्यासाठी लागणारा पांढरा दोरा, जांभूळ, फणस, धामणं आदी साहित्यांनी बाजारपेठ सजली असून विवध साहित्यांच्या खरेदीसाठी महिलावर्ग सज्ज झाल्या आहेत.
पुरातन काळापासून वटसावित्रीचे व्रत करण्याची परंपरा हिंदू धर्मात आहे. सातजन्मी हाच पती मिळावा व आपल्या संसाराचा गाडा कोणत्याही अडचणींविना सुखकर चालावा या उद्देशाने प्रत्येक विवाहित स्त्रीयांकडून वटपौर्णिमेचे व्रत आचरले जाते. दिवसभर कडक उपवास करत विवाहित स्त्रीया नव्या नवरीप्रमाणे साज-शख=ंगार करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाला साकडे घालतात. यानंतर ज्येष्ठ स्त्रीयांना कुंकूमार्चन करून त्यांना सौभाग्याच्या विविध वस्तुंनी भरलेले पानाचे वाण भेट स्वरुपात देतात. अशा पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली जाते. यामुळे उपवासासाठी लागणारी फळे, वडाच्या पुजेसाठी लागणारे साहित्य आदी वस्तुंनी खानापूरची बाजारपेठ बहरली आहे..