कालच आपण जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा एकाच दिवशी साजरी केली. दोन्हीमधे वृक्षांना महत्त्व आहे. वटपौर्णिमेला सुवासिनी वटवृक्षाची पूजा करतात, त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याचे महत्त्व आणि औषधी गुण.
भारतीय संस्कृतीत पर्यावरण संरक्षण-संवर्धन ही एका दृष्टीने देवाची आराधनाच आहे. तिचे महत्त्व जाणून ही निसर्ग संपत्ती आपल्या पुढच्या पिढीची विरासत आहे आणि तिचे सर्वार्थाने जतन करणे आपले आद्य कर्तव्य आहे. आपण हे कर्तव्य निभावले तरच पृथ्वीवर जीवन संभव आहे.
आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असणारा वटपौर्णिमा सण आहे. ज्ये÷ महिना आला की ग्रीष्माची चाहूल लागते. आभाळ भरून आलेले असते. त्यामुळे वातावरणात उष्णता वाढलेली, मध्येच पावसाची सर येणाऱया पावसाळय़ाची आठवण करून देते. ऊन-पावसाचा लपंडाव व त्यातच मनाला उत्साह, ऊर्जा, आनंद देणाऱया इंद्रधनुष्याचे दर्शन याच काळात होते. ज्येष्टात येणारी पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा. आपल्या ऋषिमुनींनी, शास्त्रकारांनी प्रत्येक सण आणि उत्सवाची रचना त्यातील वैज्ञानिक संदर्भ लक्षात घेऊन केली असावी हे नक्की. सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी या दिवशी वडाची पूजा केली, म्हणूनच यादिवशी सुवासिनी आपल्या नवऱयाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करत वडाची पूजा करतात. परंतु त्यामागचा शास्त्रार्थ जाणून घेणे आवश्यक आहे. निसर्गतः दीर्घायुषी असणाऱया वटवृक्षाचे पर्यावरणाच्या दृष्टीने संवर्धन व जतन करण्यासाठीच त्याची पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रथा आहे. कायम वाढत राहून शेकडो वर्षांचे आयुष्य असल्याने यास अक्षयवृक्षही म्हणतात.
सदापर्णी डेरेदार असल्याने विषारी वायू किंवा कार्बन डाय ऑक्साईड शोषून ऑक्सिजन अधिक प्रमाणात म्हणजे इतर झाडांपेक्षा 60 टक्के प्राणवायू हवेत जास्त सोडतो व हवा शुद्ध ठेवतो. म्हणूनच आधुनिक भाषेत व्हेंटीलेटरचेच काम करतो असे म्हटले तरी चालेल. याचे वैशिष्टय़ म्हणजे गुणाने शीत, चवीने तुरट पित्त व कफ दोषांचे शमन करणारा व अनेक व्याधीत उपयुक्त आहे. उन्हाळय़ात या वृक्षामुळे हवेत आर्द्रता सोडली जाते त्यामुळे त्याच्या छायेत गारवा मिळतो, सावली मिळते. शीत गुण असल्याने दाह जळजळ कमी करतो.
वडाचे झाड हे अनेक पक्ष्यांचे आश्रयस्थान असते. वडाची बारीक बारीक फळे ते खातात हेच त्यांचे अन्न व त्यांच्या विष्टतून परागीभवनाचे मोठे काम होते. झाडांच्या बिया अन्य ठिकाणी रुजून पर्यावरण संवर्धनास पक्ष्यांची मदत होते. पर्यावरणाचा समतोल त्यामुळे राखला जातो.
वडाची प्रत्येक फांदी, पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणूनच त्याला अनादि अनंत असा अक्षयवट म्हटले गेले आहे. त्याच्या या कालातीत अस्तित्वामुळे स्त्रिया त्याला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात. वडाची मुळे जमिनीत खूप खोलवर पसरलेली असतात. त्यांची माती धरून ठेवण्याची क्षमता अधिक असल्याने जमिनीची धूप कमी होते. जमिनीत पाणी धरून ठेवून पर्यावरणाचा समतोल राखला जातो. वडाच्या झाडाला यज्ञाच्या आहुतीमध्ये देखील खूप महत्त्व आहे. याच्याच काटय़ांचा उपयोग होम-हवनात समिधा म्हणून करतात. आरोग्याच्या दृष्टीनेदेखील वटवृक्षाला अत्यंत महत्त्व आहे. वंध्यत्व नाहीसे करून सुप्रजननासाठी प्रभावी मानले जाते. संतान प्राप्तीसाठी वटवृक्षाचा औषधी उपयोग गर्भधारण क्षमता वाढवण्यासाठी होतो. गर्भाशयाची ताकद वाढवणारे, गर्भधारणा झाल्यानंतर गर्भाची वाढ व्यवस्थित व्हावी यातही वटवृक्ष उपयुक्त आहे.
वटपौर्णिमेला वडाच्या झाडाभोवती सुती धागा बांधून प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे. यामागे शास्त्रीय कारण बघता वडाच्या झाडाच्या सभोवताली अधिक प्रमाणामध्ये ऑक्सिजन असतो. नवविवाहित स्त्रिया, नुकत्याच गर्भिणी झालेल्या स्त्रिया यांना सुप्रजननासाठी ऑक्सिजनची पंधरा टक्के वाढीव गरज असते म्हणूनच त्यांचा अधिक सहवास येथे असावा अशी योजना असावी.
निसर्गात उपलब्ध असलेली विविध रंगांची फळे आंबट-गोड रसाळ फळे अधिक जीवनसत्त्व, खनिज द्रव्य, तृप्ती देणारी, रिप्रॉडक्शनचे सर्व गुणधर्म यात असल्याने गर्भिणीला व प्रत्येक स्त्रीला लोह, फॉलिक ऍसिड, बी कॉम्प्लेक्स मिळावे व ती सुदृढ राहून सुप्रजनन व्हावे म्हणूनच तिने सर्व फळे खावीत व त्याचा फायदा तिला व्हावा याकरिताच पाच फळांचे वाण या पूजेला देण्याची प्रथा असावी. वडाची पाने, फळे, चीक व साल यांचा औषध म्हणून उपयोग होतो.
वडाचे पान-मूत्राघात, लघवी थांबत थांबत दाहयुक्त होणे, शौचास साफ न होणे. यात पिकलेल्या पानांचा काढा फलदायी ठरतो. इसबावर वडाच्या पिकलेल्या पानांची राख गोडे तेलात मिसळून लावल्यास उपयोग होतो. हीच राख मूळव्याधीवर लावल्यास मूळव्याध मऊ पडतो. सांधेदुखीला वडाची पाने गरम करून बांधल्यास वेदना कमी होतात.
पारंब्या-मधुमेहावर पारंब्यांचा काढा उपयोगी पडतो. ज्वरात अंगाची आग होत असल्यास पारंब्याचा रस घ्यावा. त्याने दाह शमन होते. पारंब्यापासून बनवलेले वट जटादितेल केशरंजन व संवर्धनात उपयोगी पडते. अतिसार, आमांश यातही जिरे घालून पारंब्याचा काढा घ्यावा.
अंकुर-वड पालवतेवेळी छोटे अंकुर येतात. ते गर्भधारणा, गर्भ प्रस्थापना, उत्तम वाढ होण्यासाठी उपयोगी आहे. मासिक पाळीच्या तक्रारीमध्येदेखील उपयुक्त. जंतामध्ये या अंकुराचा रस अत्यंत फलदायी आहे.
चिक-धातु स्तंभन करून शुक्रवर्धक आहे. जुनाट खोकला, जळवाताच्या भेगा, कृमीदंत, कंबरदुखी, सांधेदुखी, नेत्रविकारातही अत्यंत उपयोगी.
साल-श्वेतप्रदर म्हणजे पांढरे जाणे यात सालीचा काढा पोटातून घ्यावा व योनी धावनही करावे. व्रणरोपक असल्याने जखमा भरून येण्यासाठी व त्याच्या वेदनेतही उपयुक्त. मधुमेहातही याचा काढा उपयोगी आहे. इन्श़ुलिन रेझिस्टन्समुळे होणाऱया आत्ताच्या पीसीओडी व इन्फर्टीलिटीमध्ये अधिक उपयोगी. अंगास खाज आल्याने नखाची जखम झाल्यास त्यावर साल वाटून लेप करावा. अर्थात असे उपचार करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे कधीही हितावह असते.
असा बहुगुणी वटवृक्ष दीर्घायुष्याचे, आरोग्याचे प्रतीक म्हणून चैतन्य देणारा, अस्तित्वाची जाणीव करून देणारा, नक्कीच प्रेरणा देत आपल्या संस्कृतीचा वारसा जपत अनेक पिढय़ांचा साक्षीदार असून नक्कीच पूजनीय आहे. म्हणूनच आधुनिक सावित्रीबरोबर सत्यवानाने देखील एका वटवृक्षाचे रोपण, जतन व संवर्धन करून पर्यावरण संरक्षण व संतुलनासाठी एक पाऊल पुढे यावे.
डॉ. वैशाली पवन लोढा, पुणे