- पुनर्रोपण केलेल्या ‘त्या’ वटवृक्षाला फुटली पालवी
- जिल्ह्यातील पहिल्या वटवृक्ष पुनर्रोपण प्रयोगाला यश
हम बैठे घरो में, कोई छाव ढुंढ रहा ।
कोई पथिक राह में, वटवृक्ष ढुंढ रहा ।
हेमलता पालीवाल यांची ही कविता मागे कधीतरी माझ्या वाचनात आली होती. मला नक्की माहीत नाही की, कुडाळच्या गजानन कांदळगावकर आणि त्यांच्या संवेदनशील सहकाऱयांच्या ती कधी वाचनात आली होती की नाही. पण काहीही असो, या कवितेचा आशय मात्र त्यांच्या नसानसात भिनलेला जाणवत आहे.
गेली काही वर्षे आपल्या जिल्हय़ात तथाकथित विकासाचे वारे जोराने वाहू लागलेले आहेत. आपण खरं तर विकासाची वाट असं म्हणतो, परंतु अस्तित्वातली अरुंद वाट, छोटा रस्ता रुंद झाल्याशिवाय विकास नावाच्या व्याख्येपर्यंत आपण पोहोचू शकत नाही, हे पूर्ण सत्य आहे. त्या प्रवासात मग अनेक गोष्टी घडतात. त्यातली एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पूर्वजांनी रुजवलेल्या आणि जीवापाड जोपासना केलेल्या मोठमोठय़ा वृक्षांची त्यात पुरती ‘वाट’ लागते. त्यांची खऱया अर्थाने कत्तल होते. एखाद्या संवेदनशील ‘वाट’सरुला ते उघडय़ा डोळय़ांनी पाहणे, सहन करणे शक्मय होत नाही.
आपल्याकडे चार-सहा पदरी हायवे झाला आणि साठ, सत्तर, शंभर वर्षे जुने असलेले शेकडो वृक्ष बेलाशक कापले गेले. त्यांची कत्तल केली गेली. त्याची भरपाई म्हणून त्याच्या अमूक पट वृक्ष लावण्याचा सरकारी संकल्प झाला होता. त्याचे पुढे झाले ते समजले नाही. पण संकल्प झाला होता, हे मात्र नक्की. यापैकी अनेक जुने वटवृक्ष असे होते की, ज्यांच्यामागे लोकांच्या कोणत्या ना कोणत्या तरी भावना जोडलेल्या होत्या, असंख्य आठवणी होत्या, पण या विकास नावाच्या संकल्पनेपुढे त्या टिकल्या नाहीत. किंबहुना मनात असूनही टिकवता आल्या नाहीत.
पण गेल्या 27 फेब्रुवारीला पौर्णिमेच्या दिवशीच जिल्हय़ात संवेदना हरवलेलं ‘मन’ जिवंत करणारी अशी एक घटना घडली. त्यामुळे राहून राहून वाटतं, कदाचित त्यातले अनेक वृक्ष वाचवता आले असते. किमान तसा प्रयत्न झाला असता.
एरव्ही त्या घटनेचे फोटो आणि व्हीडिओ पाहताना परदेशात एखादे झाड वाचवताना केल्या जाणाऱया प्रयत्नांचा व्हीडिओ बघावा तशी ती अनुभूती होती. मला वाटतं कदाचित अशातूनच प्रेरणा घेऊन कुडाळच्या गजा कांदाळगावकर, राजन बोभाटे, प्रमोद भोगटे, किशोर राणे, दाजी गावडे आणि सहकारी मंडळीनी एका वटवृक्षाच्या पुनर्स्थापनेचे कार्य सिद्धीस नेले.
झालं असं की, कुडाळ पोलीस स्थानक ते कॉलेज रस्त्याचे रुंदीकरण सुरू आहे. त्या रस्त्यावर हॉटेल ‘मनवा’च्या जवळ एक साठ-सत्तर वर्षांचा वटवृक्ष होता. जो कत्तलीच्या यादीत अग्रस्थानी होता. ही घटना लक्षात आल्यावर युवा फोरमच्या यशवर्धन राणे आणि त्याच्या युवा सहकाऱयांनी तो वटवृक्ष वाचला पाहिजे, असा आग्रह रोटरीयन राजीव बिले यांच्याकडे धरला. सरकारी यंत्रणेला तांत्रिकदृष्टय़ा तो वाचवणे शक्मय नव्हते. मग त्यावर पर्याय शोधणे सुरू झाले. अशा सामाजिक, संवेदनशील कामात जिंदादिलीने उतरणाऱया गजानन कांदळगावकर आणि सहकाऱयांनी त्यावर अभ्यास सुरू केला. सामाजिक कार्यात काहीसं पडद्याआड राहून काम करणारे समीर साखळकर यांनी श्री नर्सरीच्या अजित म्हाडेश्वर यांच्याशी चर्चा केली आणि तो वटवृक्ष दुसऱया ठिकाणी पुनर्स्थापित करून जगू शकतो, या निष्कर्षाप्रत सर्व मंडळी आली. त्या योग्य असणारी मुळदे येथील गजाच्या फार्मवरची जागाही निश्चित झाली आणि हे कार्य यशस्वीपणे तडीसही नेण्यात आले.
मला वाटतं आठ ते दहा टन वजनी अशा महाकाय जंगली वृक्षाचे पुनर्स्थापन हा जिल्हय़ातला पहिलाच प्रयोग असावा. या कार्यसिद्धीनंतर सर्वांच्या ज्या भावना होत्या त्या गजाच्या शब्दातच सांगायच्या झाल्या तर…
‘वटवृक्ष नवीन जागेत नव्या निश्चयाने उभा राहिला, तो पुन्हा एकदा त्याची कर्तव्ये पार पाडून आमची झोळी भरण्यासाठी. आता पुन्हा पालवी येईल, फांद्या येतील, पाने येतील, पक्षी घरटी बांधतील, पांथस्थ त्याखाली सावली शोधतील. प्राणीमात्र प्राणवायू मिळवतील. आणि तो मात्र झालं गेलं सगळ विसरून सर्वांवर पुन्हा उपकार करू लागेल. पुनर्जन्मानंतरही तो दाताच असेल आणि आम्ही केविलवाणे शुद्र याचक.’
आपल्या संकृतीप्रमाणे स्त्रिया सात जन्म हाच पती मिळावा म्हणून वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात. त्याच्यासमोर व्रतवैकल्ये करतात. इथे तर साक्षात एका वटवृक्षाला पुनर्जन्म मिळावा. आपल्या पुढच्या अनेक पिढय़ांना त्याचा सहारा मिळावा, मायेची सावली मिळावी म्हणून एक अनोखं व्रत सुरू झालं आहे.
या घटनेला आज बरोबर एक महिना पूर्ण होतोय. वटवृक्षाला पालवी फुटायला सुरुवात झालीय. या वृक्षाचं जमिनीशी नातं आता दिवसेंदिवस घट्ट होत चाललं आहे. खरोखरच हे एक मोठं काम आहे. हे व्रत स्वीकारलेल्या सर्व संवेदनशील मनांचे मी हृदयापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप साऱया शुभेच्छा अर्पण करतो.