प्रतिनिधी /बेळगाव
वडगाव येळ्ळूर क्रॉसनजीकच्या शाळा नं. 31 शेजारी दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. वापरण्याजोगे पाणी गटारीमध्ये मिसळत आहे. एकीकडे शहरात दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत असताना दुसरीकडे अशाप्रकारे पाणी वाया घालविले जात आहे. पाणीपुरवठा मंडळाच्या या कारभारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.
मागील महिन्यात पाणीपुरवठा कर्मचाऱयांनी संप केल्यामुळे पाणीपुरवठय़ामध्ये व्यत्यय येत होता. शहराला पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट एल ऍण्ड टी कंपनीकडे देण्यात आले आहे. परंतु शहराला अनियमित पाणीपुरवठा होत असून त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नाझर कॅम्प वडगावनजीक मागील अनेक महिन्यांपासून पाण्याची गळती होत आहे. परंतु त्याकडे लक्ष देण्यास कोणीच तयार नाही. दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. हे पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे उंचवटा करून पाणी गटारीमध्ये सोडण्यात आले आहे. एकीकडे पाण्याची टंचाई असताना दुसरीकडे पाणी वाया घालविणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत. त्यामुळे ही गळती तात्काळ थांबवावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.