पदपथाची निर्मिती होत असून गटारींचे बांधकाम मजबूत करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
येळ्ळूर-वडगाव रस्त्याच्या बाजूला आता पदपथ तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यावर असलेली झाडे तोडण्यात येत आहेत. मंगळवारी एक झाड रस्त्यावरच पडले होते. त्यामुळे काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.
आनंदनगर ते बळ्ळारीपर्यंत पदपथ तयार करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून हे काम करण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गटारी मोठय़ा कराव्यात, अशी मागणी होत होती. कारण केशवनगर, अन्नपूर्णेश्वरीनगर परिसरातील घरांमध्ये पावसामध्ये पाणी शिरत होते. त्यामुळे नागरिकांनी मनपाकडे मोठय़ा गटारींची मागणी केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेच्या माध्यमातून पदपथ करण्यात येत आहेत.
अन्नपूर्णेश्वरीनगर, केशवनगर आणि आनंदनगर परिसरामध्ये मोठी वसाहत वाढली आहे. यामधून मनपालाही मोठा कर मिळतो. त्यामुळे करातूनच आम्हाला सोय करावी, अशी जनतेची मागणी होती. त्यानुसार जनतेच्या पैशातूनच ही कामे होत आहेत. यामुळे समाधान व्यक्त होत आहे. आनंदनगरकडून बळ्ळारीकडे जाताना उजव्या बाजूला असलेल्या गटारींची खोदाई सुरू आहे. त्यामुळे अडथळा होणारी झाडे काढण्यात येत आहेत.
दर्जात्मक काम करावे. कारण काही वर्षांतच गटारी खराब होत आहेत. तेव्हा हे काम नियोजनबद्धरीत्या करावे, अशी मागणी होत आहे. बी. एस. येडियुराप्पा रोडवर दोन्ही बाजूला गटारी झाल्या तरी रस्त्यावर पाणी साचत आहे. तशा प्रकारे या रस्त्यावर परिस्थिती निर्माण होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.