कोटद्वार मतदारसंघात ऋतू खंडुरींचे आव्हान
या निवडणुकीत एक विचित्र योगायोग समोर आला आहे. मुख्यमंत्री असताना निवडणुकीत पराभूत होणाऱया दोन नेत्यांच्या मुली यंदा स्वतःच्या वडिलांच्या मतदारसंघातच उभ्या राहिल्या आहेत. तसेच स्वतःच्या वडिलांना पराभूत करणाऱया नेत्याच्या विरोधातच निवडणूक लढत आहेत. 2012 च्या विधानसभा निवडणुकीत कोटद्वार मतदारसंघात तत्कालीन मुख्यमंत्री भुवनचंद्र खंडुरी हे काँग्रेसचे सुरेंद्र सिंह नेगी यांच्याकडून पराभूत झाले होते. भाजप तेव्हा केवळ एका जागेमुळे सत्तेच्या शर्यतीतून दूर झाला होता. यावेळी नेगी यांना कोटद्वारमध्ये खंडुरी यांच्या कन्या ऋतू यांच्या आव्हानाचा सामना करावा लागतोय.
हरिद्वार ग्रामीण मतदारसंघात 2017 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री हरीश रावत यांना भाजपचे स्वामी यतीश्वरानंद यांच्याकडून हार पत्करावी लागली होती. आत हरीश रावत यांच्या कन्या अनुपमा या यतीश्वरानंद यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. रावत अद्याप देखील काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.
काँग्रेसचे दिग्गज नेते हरीश रावत लालकुआं मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पक्षाचे सर्वात मोठे चेहरे तेच आहेत. प्रदेश प्रभारी म्हणून पंजाबमध्ये चरणजीत सिंह चन्नी यांना मुख्यमंत्री करत दलित मतदारांना पक्षाच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करणाऱया रावत यांनी उत्तराखंडमध्येही याची पुनरावृत्तीबद्दल टिप्पणी केल आहे. अलिकडेच भाजपमधून काँग्रेसमध्ये परतेलेले यशपाल आर्य हे मुख्यमंत्रिपदासाठी पात्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे. लालकुआं मतदारसंघात आर्य यांचा प्रभाव असल्याने रावत यांच्या या विधानाचा राजकीय अर्थ वेगळा आहे. यापूर्वी उत्तराखंडमध्ये दलित नेत्याला मुख्यमंत्री करण्याचा मुद्दा समोर आल्यावर रावत यांचे निकटवर्तीय प्रदीप टम्टा यांचे नाव पुढे केले जायचे. परंतु रावत यांनी आता आर्य यांचे नाव चर्चेत आणले आहे. तर भाजप रावत यांना लालकुआंमध्ये पॅराशूट उमेदवार ठरवत आहे.