स्वामी प्रसाद मौर्यांच्या मतदारसंघात जाणे टाळणार
उत्तरप्रदेशच्या योगी सरकारमध्ये मंत्री राहिलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपची साथ सोडून समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. त्यांची मुलगी आणि बदायूंच्या भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी वडिल स्वामी प्रसाद यांच्या मतदारसंघात प्रचारासाठी जाणार नसल्याचे सांगितले आहे.
मी भाजपसोबत आहे आणि राहणार आहे. माझ्या वडिलांनी समाजवादी पक्षात जाण्यापूर्वी कुठलीच चर्चा केली नव्हती. माझ्यावर भाजप सोडण्याचा दबाव नाही. कौटुंबिक जीवन आणि राजकीय जीवन अत्यंत वेगवेगळे आहे. पूर्ण राज्यात मी भाजपचा प्रचार करणार आहे. परंतु पक्षाने सूचना केली तरीही वडिलांच्या विरोधात प्रचार करणार नाही. भाजप समर्थकांना ईमानदारीचे प्रमाणपत्र देण्याची गरज मला वाटत नसल्याचे त्या म्हणाल्या.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत माझ्या वडिलांनी समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला होता. बदायूंमध्ये आता त्यातील प्रत्येक विट ध्वस्त झाल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात किल्ला कुठे होता हे देखील समजणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी 2017 मध्ये बसप सोडून भाजपचा झेंडा हाती घेतला होता. मौर्य यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले होते.