दोन युवकांना अटक : वडूथ परिसरात खळबळ
प्रतिनिधी/ सातारा
एकीकडे कडक लॉकडाऊन सुरु असताना सातारा तालुक्यातील वडूथ येथे एका युवकाचा पाय तोडून खून केल्याची घटना 21 रोजी रात्री 9 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे वडूथ परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या खूनप्रकरणी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, सचिन विठ्ठल पवार (वय 30, रा. वडूथ, ता. सातारा) असे खून झालेल्या युवकाचे नाव असून तो कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅरोलवर बाहेर होता.
याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी त्याच गावातील रणजित नंदकुमार साबळे (वय 33) व अमित दत्तात्रय साबळे या दोघांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल धीरज कुंभार यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडूथ (ता. सातारा) येथील सचिन पवार हा युवक गुन्हेगारी वृत्तीचा होता. त्याच्यावर विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणणे असे गुन्हे दाखल असून तो जिल्हा कारागृहात होता. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले असून त्यामध्ये सचिन पवारलाही सोडण्यात आल्याने सध्या तो वडूथमध्ये त्याच्या घरी रहात होता.
गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याची दहशत गावात होती. महिलांची छेडछाड करणे, त्रास देणे असे प्रकार तो करत होता. यातील संशयित आरोपींच्या बहिणी व तिच्या लहान मुलीस सचिन पवार त्रास देत होता. तसेच त्याने यापूर्वी देखील संशयित आरोपींच्या बहिणीची छेड काढली होती. या रागातूनच मग मंगळवार 21 रोजी रात्री 9 च्या सुमारास संशयित रणजित साबळे व अमित साबळे या दोघाजणांनी पूर्ववैमनस्यातून एका युवकावर सशस्त्र हल्ला चढवत त्याचे पाय तोडले. अतिरक्तस्त्रावामुळे त्या युवकाचा जागेवरच मृत्यू झाला.
सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन दोघा संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, घटनास्थळी सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी भेट देऊन तपासाबाबत सूचनाही दिल्या.
कोरोनामुळे बाहेर आला अन्
सचिन पवार याचे लग्नही झाले नव्हते. गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याच्याबाबत गावात चांगले मत नव्हते. त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्हय़ांमुळे तो तुरुंगात होता. मात्र त्याला कोरोना पार्श्वभूमीवर पॅरोलवर सोडण्यात आले होते. तो पुन्हा गावात आल्यावर संशयितांच्या बहिणीस त्रास देवू लागला अन् शेवटी त्याच्यावर जीवघेणा हल्ला होऊन त्याचा शेवट झाला. कोरोनामुळे बाहेर आला नसता तर ही वेळ आली नसती.