दमदार पावसाचा परिणाम : रोपांच्या सभोवती कुंपण घालण्याचे काम हाती
प्रतिनिधी /बेळगाव
वनखात्याने यंदाच्या पावसाळी हंगामात तब्बल 5 लाख 55 हजार रोपांची लागवड केली आहे. विशेषतः लागवड केलेली संपूर्ण रोपे सुस्थितीत आहेत. त्यामुळे वनखात्याच्या वृक्षांची संख्या वाढणार आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने लागवड झालेल्या रोपांचे संवर्धन झाले आहे.
बेळगाव वनविभागातील खानापूर, गोल्ल्याळी, नागरगाळी, लोंढा, जांबोटी, कणकुंबी आदी वनक्षेत्रात रोप लागवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बांबू, सागवान, गुलमोहर, फणस, शिसम, जांभूळ आदी वृक्षांचा समावेश आहे. विशेषतः वनक्षेत्रात वृक्ष संख्या वाढवून वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील 5 वर्षांत बेळगाव विभागातील वनक्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे साहजीकच वन्यप्राण्यांची संख्याही वाढत आहे.
बेळगाव विभागातील मच्छे, हालभावी, होसकट्टी, शिरूर तर खानापूर तालुक्मयातील सावरगाळी, ओत्तोळी, कणकुंबी, लोंढा, नागरगाळी, गोल्याळी आदी भागात वनखात्याच्या नर्सरी आहेत. या नर्सरीतून रोपांची निर्मिती करून पावसाळय़ाच्या तोंडावर लागवड केली जाते. यंदा 6 लाख 55 हजार रोप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 5 लाख रोपांची लागवड झाली आहे. दरम्यान, पावसाळय़ात रोपांचे संवर्धन होण्याबरोबर वाढ झाली आहे.
पावसाळय़ात वृक्ष लागवडीला नैसर्गिक पाणी मिळून वाढ उत्तम होते. त्यामुळे पावसाळय़ातच वृक्षारोपणाला प्राधान्य दिले जाते. दरम्यान रोपांचे जतन व्हावे, यासाठी वनक्षेत्रात तलावाची निर्मिती करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत तलावांची खोदाई केली जात आहे. त्यामुळे वनक्षेत्रातील रोपांना आणि वनप्राण्यांनादेखील या तलावातील पाण्याचा उपयोग होऊ लागला आहे.
5 लाखांहून अधिक रोपे सुस्थितीत
यंदाच्या पावसाळी हंगामात 5 लाखांहून अधिक रोपे लावण्यात आली आहेत. सर्वच रोपे सुस्थितीत आहेत. रोपांना कुंपण घातले जात आहे. पाऊस कमी झाल्यानंतर पाणी दिले जाणार आहे. रोपे जतन होत असल्याने वनक्षेत्र वाढत आहे.
– जी. पी. हर्षाबानू (उपवनसंरक्षणाधिकारी)