नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विराट कोहलीने वनडे व कसोटी क्रिकेटमधील नेतृत्व सोडू नये. या दोन्ही क्रिकेट प्रकारातील नेतृत्वाची धुरा त्याच्याकडेच असायला हवी, असे मत माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने व्यक्त केले. विराट कोहलीने अलीकडेच टी-20 नेतृत्वाचा राजीनामा दिला असून वनडेतील त्याच्या नेतृत्वाविषयी देखील चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर सेहवाग बोलत होता.
‘टी-20 क्रिकेटमधील नेतृत्वाचा राजीनामा देण्याचा स्वतः विराटनेच घेतला. पण, त्याने वनडे व कसोटीमध्ये असा निर्णय घेऊ नये, असे माझे मत आहे. त्याला केवळ खेळाडू या नात्यानेच खेळायचे असेल तर मात्र हा निर्णय त्याचा असेल. तो त्यानेच घ्यायचा आहे. विराट उत्तम खेळाडू आहे, आक्रमक कर्णधार आहे. शिवाय, पुढाकाराने लढण्याची त्याची वृत्ती आहे’, याचा सेहवागने पुढे उल्लेख केला.
भारताने 2013 नंतर एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे, आयसीसी स्पर्धेतील कामगिरीवर आत्मचिंतन करणे गरजेचे असल्याचे सेहवागने एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.