लवकरच वाघांची संख्या येणार समोर : नोंदीसाठी वनप्रदेश काढला पिंजून, वनविभागाची माहिती
प्रतिनिधी /बेळगाव
वनक्षेत्रातील वाघांची निर्दिष्ट संख्या समजण्यासाठी फेब्रुवारी 3 पासून व्याघ्रगणतीला प्रारंभ झाला आहे. वनखाते, राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरण आणि भारतीय वन्यजीव संस्थेमार्फत करण्यात आलेल्या व्याघ्रगणतीची समाप्ती झाली आहे. त्यामुळे लवकरच वाघांची संख्या समोर येणार
आहे.
बेळगाव विभागात वनक्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा नैसर्गिक अधिवासदेखील वाढला आहे. शिवाय वाघांचे खाद्य म्हणून ओळखले जाणारे हरिण, चितळ आणि सांबर यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे साहजिकच वाघांची संख्या वाढण्याचे संकेत आहेत. दर चार वर्षांनी व्याघ्रगणनेचे काम हाती घेतले जाते. मात्र, कोरोनामुळे व्याघ्रगणना लांबणीवर पडली होती.
वनविभागातर्फे सेन्सर टॅक, सीसीटीव्ही कॅमेरे यासह वाघांच्या पायांचे ठसे यावरून वाघांच्या नेंदी घेण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी वाघांच्या विष्ठावरूनदेखील नोंदी झाल्या आहेत. मागील महिन्याभरापासून वनविभागाचे पथक जंगलात तळ ठोकून आहे. विशेषतः लोंढा, भीमगड, नागरगाळी, कणकुंबी, जांबोटी आदी भागात व्याघ्रगणना झाली आहे. वनविभागाने सर्व वनप्रदेश पिंजून काढून वाघांच्या नोंदी घेतल्या आहेत. शिवाय वाघांच्या नोंदीचा अहवाल लवकरच पुढे पाठविला जाणार आहे. यानंतरच बेळगाव विभागातील वाघांची संख्याही कळणार आहे.