सातारा / प्रतिनिधी
ज्या वनमजूरांना कामावरून कमी केले होते , त्या मजूरांना पुन्हा कामावर घेण्यासंदर्भात सहायक वनसंरक्षक किरण कांबळे व वनक्षेत्रपाल विलास काळे यांच्या सोबत शिष्टमंडळाशी चर्चा झाली. त्या गरीब वनमजूरांना पुन्हा कामावर घेण्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले. तसे लेखी आश्वासनच वनविभागाने दिले, अशी माहिती वनमजुर संघटनेचे संजय घार्गे यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून वनविभागातील जंगलात, डोंगर दऱ्यात वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, त्याची देखभाल, वणव्या पासून संरक्षण करून पर्यावरण संवर्धनासाठी सर्वात जास्त व महत्त्वाचे काम प्रामाणिकपणे, कमी पगारात जास्त कष्टाचे काम करणाऱ्या वनमजूरांना ३३%च निधी मिळणार असल्याचे कारण सांगून कामावरून कमी करणाऱ्या सरकारचा जाहिर निषेध सातारा जिल्हा वनभवनाच्या समोर करण्यात आला होता. तसेच वनमजूरांना त्वरित कामावर पुन्हा घेण्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते.
सर्व मंत्र्यांच्या,अधिकाऱ्यांच्या सुख सुविधांवर होणारा खर्च कमी करावा,आवश्यकता असल्यास कर्ज काढून गरीब मजूरांच्या पगारासाठी निधी उपलब्ध करावा. परंतु त्यांना कामावरून काढू नये,ज्यांना काढले आहे त्यांना त्वरित कामावर घ्यावे यासाठी केलेल्या पाठपुराव्याला शेवटी यश आले, अशी माहिती भारतीय वन मजूर संघटनेचे संजय घार्गे यांनी दिली.