वनाधिकाऱयांच्या आशीर्वादाने वर्षानुवर्षे चालला होता प्रकार
सिंधुदुर्गातील जंगले उजाड, तर वनाधिकारी बनले गब्बर
माहिती अधिकार कार्यकर्ते बरेगार यांनी उघडकीस आणला घोटाळा
प्रतिनिधी / सावंतवाडी:
लाकूड वाहतुकीतील बदली पासमुळे अवैध लाकूड व्यवसायाला प्रोत्साहन मिळत आहे. बदली मुदतवाढ पासच्या माध्यमातून होत असलेल्या लाकूड वाहतुकीमुळे शासनाचा महसूलही बुडत असतो. बदली मुदतवाढ पास हा जंगलांचा ऱहास करण्यास कारणीभूत ठरत आहे. दोडामार्गातही वृक्षतोड बंदी आहे. मात्र, तेथे जंगलतोड मोठय़ा प्रमाणात झाली. तोड झालेले लाकूड बदली, मुदतवाढ पासच्या माध्यमातून जिरवण्यात आले. बदली पासच्या माध्यमातून हा गैरप्रकार वर्षानुवर्षे वन अधिकारी, कर्मचारी आणि अवैध लाकूड व्यावसायिक यांच्या मिलीभगतमुळे सुरू होता. या गैरप्रकाराला सामाजिक कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी वाचा फोडली. त्यामुळे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी बदली, मुदतवाढ पास देण्याचे बंद केले आहे. त्यामुळे अवैध वृक्षतोडीला आळा बसणार आहे. नारनावर यांनी भविष्यात बदली आणि मुदतवाढ पास देण्याचा निर्णय झाल्यास सर्व गोष्टींचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
सिंधुदुर्गात मोठय़ा प्रमाणात खासगी जंगल आहे. त्यामुळे सिंधुदुर्गात येण्यास अधिकारी, कर्मचारी उत्सुक असतात. आताही तीच परिस्थिती आहे. सिंधुदुर्गातील वनसंपत्तीचा मोठय़ा प्रमाणात ऱहास झाला आहे. त्यात सावंतवाडी, दोडामार्गमध्ये होऊ घातलेल्या मायनिंगमुळे अधिक ऱहास होण्याची भीती होती. मात्र, पश्चिम घाट समितीचा अहवाल आणि आवाज फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे वृक्षतोडीला ब्रेक बसला होता. परंतु वृक्षतोड या ना त्या कारणाने सुरुच असते. दोडामार्ग वगळता अन्य भागातही वृक्षतोड सुरू आहे. बदली आणि मुदतवाढ पास प्रकरणांमुळे अवैध लाकूडतोड आणि तिची वाहतूक होत असते. या गैरव्यवहाराला माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी वाचा फोडली. अशी 51 प्रकरणे असून या माध्यमातून 200 ट्रकच्या वर लाकूड वाहतूक झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बरेगार यांनी फोडली वाचा
अशा प्रकरणात अधिकारी, कर्मचारी आणि अवैध लाकूड व्यवसायात असलेल्यांची मिलीभगत असते. ती अनेक वर्षे सुरू होती. त्याला बरेगार यांनी वाचा फोडली. यामुळे बदली आणि मुदतवाढ पास प्रकरणाचे इंगित समोर आले. अशाप्रकारे खडी, वाळू, चिरे आदी वाहतूकही होत असते. परंतु तेथे महसूल विभागाची मिलीभगत असते. परंतु अवैध लाकूड वाहतुक बदली आणि मुदत वाढ पासच्या माध्यमातून होत असल्याने त्याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो. त्यामुळे दोडामार्ग भागात वृक्षतोड बंदी असतानाही तेथे जंगलतोड होऊन अशा पासच्या माध्यमातून लाकडाची वाहतूक होऊन ते जिरवले जाते. अशा वृक्षतोडीबाबत आवाज फाऊंडेशनने मुंबई उच्च न्यायालयाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी न्यायालयाने वेळोवेळी शासनाला सूचना दिल्या होत्या. परंतु गैरव्यवहारामुळे अशी तोड होत असते. त्याला वचक घालण्यासाठीच आता उपवनसंरक्षक शहाजी नारनवर सरसावले असून बदली, मुदतवाढ पास प्रकरणावर त्यांनी बंदी आणली आहे. त्यामुळे आता अवैध वृक्षतोडीला आळा बसणार आहे.
निर्णय न देताच लाकूड वाहतूक
जयंत बरेगार यांनी माणगाव खोऱयातील बदली पासचे प्रकरण काढून त्यावर कारवाई होण्यासाठी उपोषण केले. या प्रकरणात लाकूड वाहतुक करणारा ट्रक बंद पडल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर त्या ट्रकमधील लाकूड वाहतूक करण्यासाठी बदली पाससाठी अर्ज वनविभागाकडे आला. त्यानंतर हा अर्ज वनक्षेत्रपालांकडे, त्यानंतर पंचनाम्यासाठी आणि पुन्हा सावंतवाडीच्या तत्कालीन उपवनसंरक्षक यांच्याकडे आला. परंतु त्यांनी यासंदर्भात काहीच निर्णय दिला नाही. त्या दरम्यान या लाकडाची वाहतूक झाली. परंतु निर्णय दिला नसताना लाकूड कुठे गेले, याची चौकशी सुरू झाली. त्यातून हे प्रकरण पुढे आले. बरेगार यांनी हे प्रकरण उचलून धरले. त्यांनी वनपालावर कारवाईची मागणी करून कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तसेच वनपालावर कारवाईसाठी उपोषण केले. सध्या वनपालावर बदलीची टांगती तलवार आहे. परंतु बदली पास आणि मुदतवाढ पासच्या माध्यमातून अवैध लाकूड वाहतुकीवर प्रकाशझोत पडला आहे. अशी प्रकरणे जंगले आणि पर्यावरणाचा ऱहास करण्यास कारणीभूत ठरणारी आहेत. त्यामुळे याला वेळीच वचक घालण्याची गरज आहे. बरेगार यांच्या उपोषणानिमित्त उपवनसंरक्षक नारनवर यांनी ती पावले उचलली आहेत.