तीन वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आली होती समिती
प्रतिनिधी / बेळगाव
मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या संघर्षामुळे मानवी हानीबरोबरच वन्यजीवांची संख्या मात्र कमालीची कमी होऊ लागली आहे. हा संघर्ष थांबविण्यासाठी तसेच नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळण्यासाठी वनविभागातर्फे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक अधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली. मात्र, ही समिती गेली कुठे? असा सवाल वन्य विभागातील शेतकऱयांतून व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा अशा समित्या स्थापण्यापेक्षा नुकसानग्रस्तांना मदत मिळवून दिल्यास बरे होईल, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
वर्षानुवर्षे मानव व वन्यजीव यामध्ये संघर्ष होत आहेत. यामध्ये अनेकवेळा मानवांना तसेच वन्य जीवांना जीव गमवावा लागला. तसेच वन्यजीवांकडून पिकांच्या होणाऱया नुकसानीमुळे बळीराजाही आर्थिक संकटात सापडत आहे. राज्यातील बेळगावसह बेंगळूर, चामराजनगर, म्हैसूर, मंडय़ा, कोडगु, चिक्कमंगळूर, हासन, शिमोगासह इतर जिह्यांमध्ये वन्यजीवांकडून पिकांचे होणारे नुकसान अधिक आहे. यामुळे वन्यजीवांच्या मृत्यूचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. हा संघर्ष थोपविण्यासाठी समिती गठित करावी, असा प्रस्ताव वनविभागातर्फे सरकारला सादर केला होता. त्यानंतर ही समिती स्थापनही केली होती. मात्र, समितीचे काम दिसून आले नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारने या संदर्भात सकारात्मक पावले उचलली असून तीन सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीची सभा बेंगळूर येथे पार पडली. सभेमध्ये नुकसानग्रस्तांना त्वरित मदत मिळावी यासाठी समिती कार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक अधिकारी जयराम यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली होती. आता समिती स्थापन झाल्याने लवकरच नुकसानभरपाई मिळणार अशी आशा नुकसानग्रस्तांना होती. मात्र, सारे काही वाया गेल्याचे दिसून येत आहे. या समितीमध्ये राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य संजय गुब्बी, सुधीर तसेच मल्लेश यांचा समावेश होता. ही समिती जिल्हावार नुकसानभरपाईची पाहणी करून त्याद्वारे नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, कोणत्याच हालचाली झाल्या नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. तेव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हय़ात शेतपिकांचे मोठे नुकसान
बेळगाव जिह्यात मागील अनेक वर्षांपासून हत्ती, डुक्कर, गवीरेडय़ांपासून शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. विशेषतः कणकुंबी, जांबोटी, किणये, कुदेमानी, काटगाळी आदी भागांमध्ये वन्यजीवांकडून मोठय़ा प्रमाणात पिकांचे नुकसान करण्यात येते. त्यानंतर खानापूरसह इतर शहरांनजीक असणाऱया भागातही वन्यप्राण्यांचे वास्तव्य वाढले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान होत असल्याच्या घटना घडत आहेत. मात्र, जी समिती नुकसानग्रस्तांसाठी स्थापन करण्यात आली होती, ती गायब झाल्याचे दिसून येत आहे. तेव्हा ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यासाठी सरकारने पाऊल उचलावे, अशी मागणी होत आहे.