पुढील 10 वर्षांसाठी व्यापक नियोजन : दोघांनीही ओलांडलेल्या सीमांमुळे काही प्रश्न
सुधाकर काशीद/कोल्हापूर
आजरा परिसरात आता हत्तीचा वावर जणू कायमचाच झाला आहे. पाहिल्यांदा लोकांना हत्तीबद्दल कुतूहल होते, पण आता रोज होणारे शेतीचे नुकसान, पाईपलाईनचा चुराडा, पाण्याच्या टाकीच्या चिंध्या आणि हत्तीचा माणसांवर थेट हला नसला तरीही त्याच्या अस्तित्वाची एक अनाकलनीय भीती, यामुळे ‘आमच्या येथून एकदा हत्ती घालवा’ अशी लोकांची भावना आहे. या स्थितीत हत्ती त्याच्या जागी आणि लोक त्यांच्या जागी बरोबर आहेत. पण दोघात एक छुपा संघर्ष आहेच. या पार्श्वभूमीवर राज्यातील जंगलक्षेत्र व त्याच्या लगतची गावे यांचे नाते तणावमुक्त व परस्परपूरक करण्यासाठी नवे धोरण येत्या काही दिवसांतच आकाराला येत आहे.
आजऱ्यातला हत्ती हे झाले केवळ एक उदाहरण. पण, राज्यातील जंगल क्षेत्रालगत वाघ, बिबटय़ा, गवे, हत्ती, अस्वलांचा नागरी वस्तीत वाढलेला वावर व लोकांनीही ओलांडलेली जंगल सीमा त्यामुळे काही मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे वन्य प्राणी हा एक निसर्गठेवा न वाटता लोकांना उपद्रव वाटू लागला आहे आणि त्यातून निर्माण होणारा संघर्ष टाळण्यासाठी हा आराखडा तयार केला जात आहे. 12 आॅक्टोबर रोजी त्यावर महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहे.
कोल्हापूर जिह्यातील हत्तींचा वावर, हत्तीमुळे झालेले नुकसान, त्यामुळे काही ठिकाणी विस्कळित झालेले दैनंदिन जीवन आणि आता हत्तींना परत हुसकावणे ही अशक्य असलेली स्थिती अशा मुद्यांचा हा आराखडा तयार करताना विचार केला आहे. जिह्याच्या पश्चिम भागात नागरी क्षेत्रात वन्यप्राण्यांचा वावर वाढला आहे. गव्यांचा कळप शेतात घुसला की पूर्वी आवाज करून, फटाके लावून त्याला हुसकावून लावता येत होते. हत्तीचेही तसेच होते, गावकरी आवाज करून हत्तीला परतवत होते. आता गवे, हत्ती त्याला दाद देत नाहीत, त्याला घाबरत नाहीत, वाजणारे ढोल फुटले तरी हत्ती त्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतीचे डोळय़ादेखत होणारे नुकसान त्यांना पहावे लागत आहे. नुकसान व भरपाई यात मोठा फरक आहे.
अशीच स्थिती शाहूवाडी, राधानगरी तालुक्यातील धनगर वाडय़ा-वस्त्यांत आहे. बिबटय़ा, वाघाचा तेथे वावर आहे. कुत्री तर गावातील वाघ, बिबटय़ांचे भक्ष्य आहेतच, पण पाळीव जनावरांनाही त्यांचा धोका आहे. बिबटय़ाच्या वावराबद्दल तक्रार केली की ‘सारा गाव खाली करा, दुसरीकडे तुमचे पुनर्वसन करतो’ अशी इशारेवजा उत्तरे ठरलेली आहेत. त्यामुळे बिबटय़ा, वाघाच्या अस्तित्वाची भीती उशाला घेऊनच येथील लोकांना रात्र काढावी लागत आहे.
केवळ जिह्यात नव्हे तर राज्यात अनेक ठिकाणी या स्वरूपाचे कमी आ†धक प्रश्न आहेत. एक दोन ठिकाणी तर वाघाला रोखण्यासाठी त्याला आधिकृतपणे बंदुकीने टिपले गेल्याची घटना ताजी आहे. अर्थात लोकांचा जीव वाचवण्यासाठी वाघाचाच कायमचा बंदोबस्त करणे, हा काही मार्ग नाही. त्याची वन विभागालाही कल्पना आहे. पण अशा संघर्षाच्या घटना वारंवार कमी-अधिक प्रमाणात घडू लागल्या आहेत. त्या रोखण्यासाठी एका धोरणाची गरज आहे. ते धोरण जवळजवळ निश्चित झाले आहे. वन विभाग, पर्यावरण, ग्रामस्थ व अभ्यासक अशा सर्व घटकांच्या भामिकांचा त्यात विचार आहे आणि ते धोरण पुढीले दहा वर्ष राबवले जाणार आहे.
वन्यप्राणी आणि माणूस यांच्यातील सीमारेषा थोडय़ा अस्पष्ट झाल्या आहेत. त्याला वेगवेगळी कारणे आहेत. या सर्वांचा अभ्यास करून मुख्यमंत्री, वनमंत्री, पर्यावरण मंत्री आणि वन खात्याचे वारिष्ठ अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत पुढच्या दहा वर्षांसाठी एक चांगले धोरण निश्चित होईल.
सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर