पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल
प्रतिनिधी/ सातारा
वन्यजीवांचे व वनसंपदेचे रक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. मात्र, काहीजणांकडून वनविभागात वन्यप्राण्यांची शिकार, तस्करी, वनसंपत्तीचे नुकसान करणे, वणवा लावणे आदी प्रकार केले जातात. अशा प्रवृत्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सातारा जिल्हा व्याघ्र कक्ष समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी दिला.
जिल्हा व्याघ्र समितीची बैठक बंसल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक एस. जी. साळुंखे, सचिन डोंबाळे, एस. सी. साळुंखे, वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस, पोलीस निरीक्षक गणेश वाघ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे, उपचिटणीस अमोल भुसे, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे, रोहन भाटे उपस्थित होते.
यावेळी वनविभागात होणाऱया वन्यप्राण्यांच्या शिकारी, तस्करी रोखण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर वणवा लावणे, वृक्षतोड, वन्यप्राण्यांच्या शिकार करणाऱया टोळय़ा, शेत जमिनीत पिकांच्या संरक्षणासाठी वीजेचा प्रवाह सोडणे यामुळे वन्यजीवांची हत्या होत असते. हा कायद्याने गुन्हा आहे. अशा सर्व कृत्यांना कडक शासन करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.
तसेच वन्यप्राणी नागरी वसाहतीत घुसल्यास त्याला पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतात. मात्र, त्यामुळे वनविभागास काम करताना अडथळा होतात. गर्दीमुळे अडथळा निर्माण होवून घातपात होण्याचीही शक्यता असते. अशा घटनांमध्ये देखील नागरिकांनी गर्दी न करता वनविभाग व पोलीस दलास सहकार्य करण्याची भूमिका घेतली असेही आवाहन बंसल यांनी केले आहे.