बारमाही पिके वाचविण्यासाठी कसरत : अत्यल्प नुकसानभरपाईकडे शेतकऱयांची पाठ : वनखात्याने उपाय करणे अत्यावश्यक
आप्पाजी पाटील /नंदगड
खानापूर तालुक्मयाच्या पश्चिम व दक्षिण भागात जंगली जनावरांमुळे शेती करणे जोखमीचे झाले आहे. हाती आलेल्या तसेच लागवड केलेल्या पिकांची जंगली जनावरांकडून मोठय़ा प्रमाणात नासधूस होत असल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेती करावी की नको, हा यक्षप्रश्न शेतकऱयांसमोर उभा आहे.
खानापूर तालुक्मयाच्या जांबोटी, निलावडे, रामगुरवाडी, नेरसा, असोगा, शिरोली, तिवोली, गुंजी, करंबळ, लोंढा, कापोली, गोधोळी, गोदगिरी, हलशी, हलगा, कक्केरी, भुरुणकी, लिंगनमठ तसेच मलप्रभा नदीकाठावर शेतकरी ऊस, मिरची, भात, रताळी यासह नगदी पिके घेतात. हत्ती, अस्वले व गव्यांकडून ऊस पिकांचे नुकसान करण्यात येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयांना शासनाकडून अल्पप्रमाणात नुकसानभरपाई मिळत असल्याने शेतकऱयांकडून मोबदला मिळविण्यासाठी अर्ज केला जात नव्हता. अल्प मोबदला आणि नुकसानभरपाई मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वेळेचा अपव्यय होत होता.
यामुळे शेतकऱयांना शासकीय मोबदला म्हणजे ‘भीक नको पण कुत्रा आवर’ अशी पाळी शेतकऱयांवर येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतीचे संरक्षण करण्यासाठी सरकारने बंदुक वापरण्याचे परवाने दिले असले तरी जंगली जनावरांना बंदुकीने मारणे हा गुन्हा असल्याने कितीही नुकसान झाले तरी जंगली जनावरांवर बंदुकीचा वापर करता येत नाही. त्यामुळे रात्रीच काय सायंकाळी व पहाटेच्या वेळी गव्यांसह अन्य जंगली जनावरे ऊस पिकाचे नुकसान करत
आहेत.
चरी बुजल्याने जंगली जनावरे मोकाट
जंगलाच्या सभोवती चरी खोदण्यात आल्या होत्या. त्यामुळे जंगली जनावरे शेतवडीत येण्याचे प्रमाण काहीअंशी कमी झाले होते. खोदलेल्या काही ठिकाणच्या चरी बुजल्याने जंगली जनावरांना शेतवडीत येणे सोयीचे झाले आहे. काही ठिकाणी वनखात्यातर्फे जंगलाभोवती तारेचे कुंपण घालण्यात आले होते. अलीकडे जंगलाच्या सभोवती कुंपण करणे काही प्रमाणात कमी झाले आहे, दुसरीकडे जनावरांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जंगली जनावरांना शेतवडीत घुसणे सोयीचे झाले
आहे.
अलीकडे गव्यांची संख्या वाढल्याने ते कळपाने शेतवडीत दिवसाढवळय़ा येत आहेत. त्यामुळे संबंधित शेतकऱयांना पीक वाचविण्यापेक्षा स्वतःचा जीव वाचविणे महत्त्वाचे ठरत असून त्यांचा प्रतिकार करणे कठीण झाले आहे.
पीक नुकसानभरपाई अत्यल्प
जंगली जनावरांकडून ऊस व भात पिकांच्या नुकसानीसंदर्भात यापूर्वी वनखात्याला कळविण्यात आले. त्यांनी नुकसानभरपाईचा पंचनामा केला व ती मिळवून देण्यासाठी शासनदरबारी प्रस्ताव पाठविला. लाखो रुपयांचे नुकसान झालेल्या शेतकऱयांना केवळ एक, दोन, पाच हजार अशी नुकसानभरपाई मिळाली. त्यामुळे अर्ज व इतर कागदपत्रांसाठी खर्च केलेला पैसाही मिळाला नसल्याने संतप्त शेतकऱयांनी अलीकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज करणे टाळले आहे.
शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
वनखात्याने शेतकऱयांच्या पिकांबाबत तातडीने निर्णय घेऊन जनावरांचा बंदोबस्त करून नुकसानग्रस्त शेतकऱयांना योग्य मोबदला देणे गरजेचे आहे. याबाबत ठोस निर्णय न झाल्यास शेतकरी उग्र आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.