प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. अनेक गरीब कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्यावतीने शहरातील गरजूंना मदत देण्यात येत आहे. मात्र दुर्गम भागातील गरजू कुटुंबीयांकडे दुर्लक्ष झाल्याने ही समस्या जाणून घेऊन वन टच फाउंडेशनने त्यांना मदतीचा हात दिला आहे. लोकमान्य सोसायटीने दिलेली मदत त्यांनी दुर्गम भागातील कुटुंबीयांना देऊ केली आहे.
अत्यंत दुर्गम भागात जांबोटी येथून पाच किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात चेरेखाणीवाडा येथे 15 ते 18 कुटुंबे वसली आहेत. त्याशिवाय हब्बनहट्टी येथून 32 किलोमीटर अंतरावर वसलेल्या तळावडे गावात आणि गवळीवाडा या ठिकाणी जाऊन जीवनावश्यक वस्तू, आहार धान्य आणि इतर साहित्याचे वाटप करून येथील कुटुंबीयांची गरज भागविली आहे.
शहरातील गरजू कुटुंबीयांना मदत करण्यासाठी अनेक संस्था धावतात. मात्र, दुर्गम भागातील कुटुंबीयांकडे दर वेळेस दुर्लक्ष करण्यात येते. मात्र, वन टच फाउंडेशनने गरज ओळखून मदत दिल्याबद्दल गावकऱयांच्यावतीने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी वन टच फाऊंडेशनचे विठ्ठल पाटील, संतोष गंधवाले, ज्योतिष कुरुडे, नारायण कांगले, रमेश सुतार, धनश्री पाटील, देवयानी पाटील, सुधीर गोडसे, आकाश गोडसे उपस्थित होते.