’तरुण भारत’ हेच माझे ज्ञानपीठ : पत्रकारिता पदवी परीक्षेत यश
प्रतिनिधी/ सातारा
’तरुण भारत’ मध्ये गेली 32 वर्षे प्रतिनिधी म्हणून कार्यरत असलेले मायणी, ता. माण येथील रहिवासी प्राचार्य दिलीप पुस्तके 2015 साली नोकरीतून निवृत्त झालेत. मात्र यंदा वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी टिळक विद्यापीठातून बीजे बॅचरल ऑफ जर्नालिझम पदवी परीक्षेत सातारा जिल्हय़ात प्रथम तर विद्यापीठात दहावा क्रमांक पटकावत या वयात देखील यशाला गवसणी घातली आहे.
दरम्यान, ’तरुण भारत’ हेच माझ्यासाठी ज्ञानपीठ असल्याने या यशाची मला खात्री होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत ’तरुण भारत’चे समुहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकूर तसेच संपादक जयवंत मंत्री यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यमाने घेण्यात आलेल्या बॅचलर ऑफ जर्नालिझम पत्रकारीतेतील पदवी परीक्षेत तरुण भारतचे जेष्ठ पत्रकार प्रा. दिलीप मलिकार्जुन पुस्तके यांनी विद्यापीठात 10 वा क्रमांक तर सातारा केंद्रात प्रथम क्रमांक पटकवला. त्यांना या परीक्षेत ’अ’ प्लस श्रेणी मिळाली आहे.
प्राचार्य दिलीप पुस्तके यांनी गेली 32 वर्षे ’तरुण भारत’ या एकमेव वृत्तपत्रात ‘मायणी’ प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. सातत्याने समाजहिताचे भान राखत त्यांनी शैक्षणिक क्षेत्र व पत्रकारिता क्षेत्रात वाटचाल केली आहे. खटाव तालुक्याचे जेष्ठ पत्रकार स्व. एम. बी. देशमुख व एम. आर. शिंदे यांचे ते शिष्य होते. स्व. आमदार भाऊसाहेब गुदगे यांची ‘उरमोडीचा भगीरथ’ ही मुलाखत विशेष गाजली.
दरम्यान, या यशाबद्दल प्राचार्य पुस्तके यांचे जिल्हय़ाच पालकमंत्री बाळासाहेब पाटील, ’तरुण भारत’चे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, डॉ. दिलीपराव येळगावकर, कराड मर्चंटचे अध्यक्ष सत्यनारायण मिनियार, सरपंच सचिन गुदगे, मायणी मेडीकल कॉलेजचे अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख, मायणी भाग शिक्षण संस्थेचे सचिव एस. डी. कुबेर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या समन्वयक पुजा चव्हाण तसेच ’तरुण भारत’ परिवाराने अभिनंदन केले.