‘देव तारी त्याला कोण मारी’ अशी म्हण आहे. अधेमधे तिची सत्यता पटेल अशा घटना घडतात. बेंगळूर येथील अशीची ही एका नवजात बालकेची ही सत्यकथा…तिचे वय अवघे एक वर्षाचे आहे. लहान मुलांना सहसा कोरोना होत नाही असे म्हणतात. पण या बालिकेला तो झाला. नुसता झाला नाही, तर तो बरा व्हायला तब्बल अडीच महिने (74 दिवस) लागले.
बेंगळूर येथील रेनबो बालरूग्णालयात तिच्यावर उपचार करण्यात येत होते. साडेदहा आठवडय़ांच्या प्रदीर्घ उपचारानंतर तिला नुकतेच घरी पाठविण्यात आले आहे. वैशाली असे तिचे नाव. तिचे ऑक्टोबर अखेरीस पोट सुजले होते. तसेचे बराच ताप होता. त्यामुळे रूग्णालयात निदान करण्यात आले. कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तेथेच भरती करून घेण्यात आले. रूग्णालयाचे बिल सहा लाखांहून अधिक झाले. वैशालीच्या आईवडिलांची सांपत्तीक स्थिती बेताचीच आहे. आपली शेती आणि घर गहाण टाकून त्यांनी रूग्णालयाचे बिल कसेबसे दिले. पण आता बरे झाल्यानंतरच्या क्ष किरण चाचण्या करून घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत अशी स्थिती ओढवली आहे. तिच्या फुप्फुसांच्या 95 टक्के भागाला संसर्ग झाला होता. आता प्रकृती सुधारली आहे, पण होते नव्हते ते सारे कोरोनाने नेले.
बेंगळूरच्या महानगरपालिकेने तिला या खासगी रूग्णालयात भरती केले होते. अशा स्थितीत महापालिकेने उपचारांचा सर्व खर्च करायचा असा नियम आहे. तथापि, रूग्णालयाने महापालिकेच्या नावाने बिल काढण्याऐवजी चुकून तिच्या पालकांच्या नावेच काढले. तर डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार महापालिकेने उपचारांच्या खर्चाच्या केवळ काही टक्के रक्कमच दिल्याने बिल मातापित्यांच्या नावाने काढण्यात आले. त्यामुळे आता लोकांकडून पैसे गोळा केले जात आहेत.