गौंडवाड अजूनही धुमसतेच : तरुणाई परागंदा : गावाला पोलीस छावणीचे स्वरुप : गेल्या दोन वर्षांपासून देवस्थानाच्या 27 एकर जागेवरून गावात वाद
प्रतिनिधी /बेळगाव
युवकाच्या खुनानंतर संतप्त जमावाने केलेली जाळपोळ, दगडफेक, तोडफोड आदी घटनांमुळे तणावग्रस्त बनलेल्या गौंडवाड, ता. बेळगाव येथे रविवारी शुकशुकाट होता. धरपकडीच्या भीतीने तरुणाईने गाव सोडले आहे. केवळ वृद्ध व महिला घरात असून गावात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. रविवारी सायंकाळपर्यंत गौंडवाड येथील परिस्थिती नियंत्रणाखाली असली तरी गावात स्मशान शांतता पसरली होती.
संतप्त जमावाने केलेली जाळपोळ व दगडफेकीत डझनाहून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. गवतगंज्याही पेटविण्यात आल्या आहेत. रविवारी पहाटेपासून पोलिसांनी धरपकडीची मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे गावातील तरुण परागंदा झाले आहेत. ‘आमची मुले कोठे आहेत? त्यांना घरी पाठवा!’ असे सांगत महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
आमच्या मुलांना गावात आणा
गावातील शंभरहून अधिक महिलांनी केएलई इस्पितळ गाठले. शनिवारी रात्री खून झालेल्या सतीश राजेंद्र पाटील (वय 37) या युवकाच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणीची प्रक्रिया सुरू होती. गावातील तरुण या ठिकाणी असणार, अशी महिलांची समजूत होती. तेथेही आपली मुले दिसली नाहीत म्हणून त्यांनी पोलीस अधिकाऱयांकडे चौकशी सुरू केली आहे. सायंकाळी सतीशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तोपर्यंत आमच्या मुलांना गावात आणा, अशी मागणी महिलांनी केली.
सतीशची पत्नी पूजा हिचा एकच आक्रोश सुरू होता. तिचे सांत्वन करण्यासाठी गावातील महिला त्यांच्या घरासमोर जमा झाल्या होत्या. सतीशची मोटारसायकल घरासमोर उभी करण्यात आली होती. पूजा त्या मोटारसायकलकडे पाहून सतीश कुठे आहे? त्याच्याकडे मला घेऊन चला, असे म्हणत हंबरडा फोडत होती. तिची अवस्था पाहून गावातील महिलांनाही अश्रू अनावर झाले होते.
सतीश सामाजिक कार्यात नेहमी होता आघाडीवर
व्यवसायाने मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असणारा सतीश औषध दुकानही चालवत होता. आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार. गावातील सामाजिक कार्यात तो नेहमी आघाडीवर असायचा. सतीशच्या घरासमोरच काळभैरवनाथ मंदिर आहे तर घराच्या डाव्या बाजूला श्री लक्ष्मीदेवीचे मंदिर आहे. देवस्थानाच्या 27 एकर जागेवरून गावात गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू होता. ही जागा परत देवस्थानाला मिळविण्यासाठी सतीशने स्वखर्चाने कायदेशीर लढाई सुरू केली होती. मंगळवारी या खटल्याचा निकालही लागणार होता.
इनोव्हा बाजूला घेण्यावरून वादावादी
सतीशच्या घरासमोरच धनलक्ष्मी जनरल स्टोअर्स आहे. या दुकानासमोर आनंद रामू कुट्रे (वय 60) यांनी आपली इनोव्हा उभी केली. दुकानाच्या बाजूलाच विहीर आहे. रविवारी काळभैरवनाथाची पूजा असते. यासाठी विहिरीतून पाणी घेऊन मंदिराची साफसफाई केली जाते. दुकानासमोर उभी करण्यात आलेली इनोव्हा बाजूला घेण्यास सांगण्यात आले. त्यावेळी आनंद याने नकार दिला. यावरून वादावादीला सुरुवात झाली. पंचांना बोलाविण्यात आले. पंचांनी समजावून सांगितल्यानंतर नंदू निलजकर या पंचालाही मारहाण करण्यात आली. याचवेळी सतीश पाटीलवर चाकू व जांबियाने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सतीशला खासगी इस्पितळात हलविण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.
सतीशच्या मृत्यूनंतर जमाव संतप्त
संपूर्ण गावाच्या कामी येणारा सतीश खरोखरच गावाच्या कामी आला. ही माहिती समजताच जमाव संतप्त झाला. आनंद कुट्रे यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. जवळच असलेल्या श्री गणेश मंदिराशेजारील बाळू निलजकर यांच्या घरावरही जमावाने हल्ला केला. केए 22 ईएन 399 क्रमांकाची ऍक्टिव्हा उलटण्यात आली. केए 22, टी 3553 क्रमांकाचा ट्रक्टर पेटविण्यात आला. केए 22, सी 157 क्रमांकाचे मालवाहू वाहन उलटवून पेटविण्यात आले. होळी गल्ली परिसरात या घटना घडल्या.
दौलत मुतगेकर यांच्या घरावरही दगडफेक करण्यात आली. घरासमोर उभ्या करण्यात आलेला पॉवर टिलर पेटविण्यात आला. आंबेडकर गल्लीजवळ उभा करण्यात आलेला एक ट्रक्टर पेटविण्यात आला. तीन गवतगंज्यांना आगी लावण्यात आल्या. गावच्या वेशीवर असलेल्या शिवपुतळय़ाजवळ उभा करण्यात आलेला केए 23, 7426 क्रमांकाचा भैरवनाथ वॉटर सप्लाय हा पाण्याचा टँकर पेटविण्यात आला.
संतप्त जमावाने मारुती गल्ली येथील केए 25, डी 0204 व केए 22, सी 0113 क्रमांकाची मालवाहू वाहने पेटविली. याच परिसरात उभ्या करण्यात आलेल्या केए 22, सी 5862 क्रमांकाच्या गुड्स वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या. जयराम पवार यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या केए 22, ए 7772 क्रमांकाचा टेम्पो फोडण्यात आला. केए 24, एम 357 क्रमांकाच्या मारुती-800 कारवर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या आहेत.
पोलिसांचा नाकर्तेपणा युवकाच्या खुनानंतर गौंडवाड येथे संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. जाळपोळ, तोडफोड, दगडफेकीच्या घटना घडल्या. काकती पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे दंगल वेळेत आटोक्मयात आली नाही. सध्या गावात शांतता असली तरी सतीश पाटील या युवकाच्या खुनामुळे गौंडवाड धुमसते आहे. शनिवारी रात्री इनोव्हा बाजूला घेण्यावरून खुनाची घटना घडली असली तरी याला देवस्थानाच्या जमीन वादाची पार्श्वभूमी आहे. वेळीच प्रशासनाने हस्तक्षेप करून समझोता घडवून आणला नाही तर शनिवारच्या घटनेची पुनरावृत्ती घडण्याची शक्मयता अधिक आहे.