बेळगाव : / प्रतिनिधी
लॉकडाऊनमुळे बरेच दिवस ठप्प असलेल्या बाजारपेठेत चौथ्या टप्प्याच्या शिथिलतेमुळे खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली आहे. खरेदीसाठी नागरिकांची वर्दळ वाढली असली तरी कोरोनाच्या धास्तीने खरेदी मंदावली असल्याचे व्यापारी सांगत आहेत.
सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत बाजारपेठ सुरू ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून दुकाने सकाळी सुरू करून सायंकाळी बंद केली जात आहे. त्यामुळे बाजारपेठेत सकाळपासून असलेली गर्दी सायंकाळच्यावेळी ओसरू लागली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून बाजारपेठ सुरू असल्याने जीवनावश्यक वस्तू मिळणे सोयिस्कर बनले आहे. कोरोनामुळे मध्यंतरी बाजारपेठ पूर्णपणे बंद होती तर काही दिवस मर्यादित वेळेसाठी सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू मिळणे कठीण झाले होते. दरम्यान, किराणा माल उपलब्ध न झाल्यामुळे किराणा साहित्याचे दर भरमसाट वाढले होते. आता आंतरराज्य वाहतूक सुरू झाल्याने बाजारपेठेत नवीन माल येत असल्यामुळे दरही पूर्वपदावर आले आहेत.
शहरातील गणपत गल्ली, समादेवी गल्ली, खडेबाजार, कलमठ रोड, मारुती गल्ली आदी ठिकाणी विविध वस्तू खरेदीसाठी गर्दी वाढू लागली आहे. बेळगाव बाजारात कोकणसह चंदगड तालुक्मयातील नागरिक खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात येतात. मात्र आंतरराज्य वाहतूक बंद आहे. त्याबरोबरच राज्य सीमा हद्दीवर कडक बंदोबस्त वाढविण्यात आल्याने बाहेरील राज्यातील ग्राहकांचे येणे बंद झाले आहे. त्यामुळे बाजारपेठेवर परिणाम झाल्याचे व्यापारी सांगत आहेत.
लग्न सराईचा हंगाम गेला वाया
एप्रिल मे महिन्यात लग्न कार्य, शुभ कार्य, वास्तू, इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे बाजारपेठेत मोठी उलाढाल होत असते. मात्र यावषी कोरोनाच्या संकटामुळे ग्राहकांची खरेदी कमी झाली आहे. त्यामुळे हंगाम वाया गेल्याचे व्यापाऱयांचे म्हणणे आहे. मे महिन्यात अधिक प्रमाणात लग्न समारंभ आयोजित केले जातात. त्यामुळे विविध साहित्यांच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असायची. मात्र विवाह सोहळे यासह इतर सर्व कार्यक्रम साध्या पद्धतीने होत असल्यामुळे खरेदी बरीच थंडावली आहे.