वृत्तसंस्था/ कराची
येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात भरविली जाणार आहे. या स्पर्धेत पाक संघाला भारतीय शासनाकडून व्हिसाची लेखी ग्वाही मिळाली नाही तर सदर स्पर्धेचे ठिकाण बदलण्यासाठी पीसीबीचे प्रयत्न राहतील, असे प्रतिपादन पीसीबीचे चेअरमन एहसान मणी यांनी केले आहे. सदर स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये घेण्याचा प्रस्ताव पीसीबीकडून आयसीसीकडे केला जाईल.
भारतात होणाऱया या स्पर्धेसाठी जगातील विविध देशांचे संघ सहभागी होत आहेत. दरम्यान या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी भारताच्या शेजारी असलेल्या राष्ट्रामधील शौकिन मोठय़ा प्रमाणात उत्सूक आहेत. दरम्यान या स्पर्धेसाठी पाक संघ तसेच पाक शौकिनांना भारतीय शासनाकडून व्हिसाची लेखी हमी मिळणे जरूरीचे आहे. आयसीसीकडून या समस्येवर कोणता तोडगा काढला जाईल याकडे पीसीबीचे लक्ष लागले आहे, असे चेअरमन एहसान मणी यांनी लाहोरमधील पीसीबीच्या प्रमुख कार्यालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले. या स्पर्धेत पाकमधून शौकिन तसेच अधिकारी आणि पत्रकार सहभागी होण्यासाठी उत्सूक आहेत.
येत्या मार्चअखेर भारताच्या शासनाकडून या स्पर्धेसाठी व्हिसा संदर्भात लेखी ग्वाही पीसीबीला मिळावी, असे पीसीबीतर्फे आयसीसीला यापूर्वीच कळविले आहे. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी संपूर्ण पाक संघाला सुरक्षा व्यवस्थाची हमी बीसीसीआयकडून मिळण्यासाठी पीसीबीचे प्रयत्न चालू आहेत.
अलिकडच्या कालावधीत विदेशी संघांनी पाकचा दौरा केला आहे. यापुढे पाकमधील क्रिकेटला पुन्हा चालना मिळण्याची शक्यता असून 2021 क्रिकेट हंगामात पाकमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा यशस्वी केल्या जातील, अशी ग्वाही मणी यांनी दिली आहे. भारत आणि पाक यांच्यातील तणावग्रस्त परिस्थिती अद्याप निवळली नसल्याने आयसीसीच्या या स्पर्धे संदर्भात निर्णायाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.