नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पूर्वनियोजित रुपरेषेप्रमाणे भारतात होणारी आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा युएईमध्ये होईल, असे बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सोमवारी अधिकृत जाहीर केले. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱया या स्पर्धेबाबत प्रतिकूल परिस्थितीमुळे बरीच अनिश्चितता निर्माण झाली होती. इंग्लंड-ऑस्ट्रेलियासह अनेक देशांच्या यादीत भारत ‘रेड लिस्ट’मध्ये असल्याने विदेशातील संघ भारतात पोहोचणार कसे, हा प्रश्न होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला असण्याची शक्यता अधिक आहे.
ही स्पर्धा 17 ऑक्टोबरला सुरु होणार का, या प्रश्नावर मात्र गांगुली यांनी अद्याप तसे काहीही निश्चित केले गेलेले नाही, असे सांगितले. आयसीसीने या स्पर्धेच्या यजमानपदाबाबत निर्णय घेण्यासाठी बीसीसीआयला 4 आठवडय़ांची मुदत दिली होती. बीसीसीआय सचिव जय शाह यांनीही सर्व संलग्न राज्य संघटनांना या निर्णयाची लेखी कल्पना दिली असून खेळाडू व सर्व संलग्न घटकांचे स्वास्थ्य व सुरक्षितता महत्त्वाची असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे नमूद केले.
या स्पर्धेतील पात्रता फेरीचे सामने ओमान येथे होतील व त्यानंतर युएईमध्ये आयपीएल पाठोपाठ विश्वचषकाचे सामने देखील खेळवले जातील, असे सध्याचे नियोजन आहे.