बीसीसीआय ऍपेक्स समिती सदस्य अंशुमन गायकवाड यांचे संकेत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्याची प्रतिकूल स्थिती पाहता, यंदा ऑस्ट्रेलियात आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धा होणे कठीण आहे. कालांतराने ही स्पर्धा रद्द केली गेली किंवा लांबणीवर टाकली गेली तर ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या या टाईम-विंडोमध्ये आयपीएल स्पर्धा होऊ शकेल, असे संकेत बीसीसीआय ऍपेक्स समितीचे सदस्य अंशुमन गायकवाड यांनी बुधवारी दिले. कोव्हिड-19 मुळे जी अनिश्चितता निर्माण झाली आहे, त्याचा सामना करण्याची तयारी प्रत्येक खेळाडूने ठेवावी, असे आवाहन त्यांनी येथे केले.
‘यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा ठरलेल्या रुपरेषेप्रमाणे होणे खूपच कठीण आहे आणि आयपीएलबद्दल बोलायचे तर आताच काहीही भाष्य करणे योग्य ठरत नाही. भारतीय हवामान, वातावरण कसे असेल, यावर बरेच काही अवलंबून असेल आणि आयपीएल जर झाली तर या विश्वचषक स्पर्धेच्या कालावधीतच होऊ शकते’, असे गायकवाड यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. ‘जर विश्वचषक स्पर्धा रद्द केली गेली किंवा लांबणीवर टाकली गेली तर आयपीएल होऊ शकते. अर्थातच, भारतातील परिस्थिती यासाठी सकारात्मक असणे क्रमप्राप्त असेल’, असा त्यांचा होरा आहे.
कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन झाल्यानंतरचे जग खूप वेगळे असेल आणि त्या वातावरणाशी, भिन्न परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी खेळाडूंनी आतापासूनच मनाची तयारी करावी, त्यासाठी खंबीर रहावे, असे अंशुमन पुढे म्हणाले. कोव्हिड-19 चे जगभरात 50 लाखापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून 3.25 लाख नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
कसे असेल कोव्हिड युगानंतरचे क्रिकेट?
कोव्हिड-19 नंतरचे युग खूप वेगळे असेल. ते कसे असेल, याबद्दल बोलताना अंशुमन गायकवाड म्हणाले, ‘यापुढील क्रिकेट नेहमीसारखे अजिबात नसेल. सर्वांचा दृष्टिकोन वेगळा असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्टेडियममध्ये नेहमीसारखी गर्दी नसेल. मुळात, क्रिकेटपटूंना प्रेक्षकांच्या गर्दीशिवाय खेळण्याची सवय नाही. त्यामुळे, या प्रकारे क्रिकेट खेळणे खूप वेगळे असणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता, आणखी किमान दोन ते तीन महिने कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सुरु होणे कठीण आहे. क्रिकेट सुरु होणे, हे वाचणे आणि लिहिण्याइतके सोपे नसेल. यापुढे सोपे काहीच असणार नाही’.