वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑलिम्पिक पात्रता कालावधी नोव्हेंबरअखेरपर्यंत रद्द करण्याचा निर्णय वर्ल्ड ऍथलेटिक्सने घेतल्यामुळे भारताच्या ट्रक अँड फिल्ड स्पर्धकांना मोठा धक्का बसला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव ओसल्यानंतर या कालावधीत देशात होणाऱया स्पर्धांतून ऑलिम्पिक पात्रता मिळविण्याचा त्यांचा मनोदय होता. पण या निर्णयामुळे त्यांच्यासमोर आता नवे आव्हान उभे राहिले आहे.
सध्या कोरोना महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष खेळ केव्हा सुरू होणार, याबाबत निश्चित सांगता येणार नाही. त्यामुळे या कालावधीत कोणत्या स्पर्धा होणार हेही सांगता येत नाही. वर्ल्ड ऍथलेटिक्सने 6 एप्रिल ते 30 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱया राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांतून ऑलिम्पिक पात्रता मिळविता येणार नसल्याचा निर्णय मंगळवारी जाहीर केला. या कालावधीत स्पर्धा झाल्यास त्यांचा ऑलिम्पिक पात्रतेसाठी विचार होणार नसल्याचे त्यावरून स्पष्ट झाले. भारतीय ऍथलेटिक्सचे उपमुख्य प्रशिक्षक राधाकृष्णन नायर यांनी हा निर्णय भारतीय क्रीडापटूंसाठी निराशाजनक ठरणारा असल्याचे म्हटले आहे. ‘तेजिंदर पाल सिंग तूर (गोळाफेक), अनू रानी (भालाफेक), एम. श्रीशंकर (लांब उडी), धावपटू दुती चंद यांच्यासाठी हा फार मोठा धक्का आहे,’ असे ते म्हणाले.
स्टार धावपटू हिमा दासही अजून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली नाही. भालाकफेकपटू नीरज चोप्रा, त्याचा सहकारी शिवपाल सिंग, 4ƒ400 मी. मिश्र रिले संघ, केटी इरफान (20 किमी चालणे), भावना जट (महिला 20 किमी चालणे), अविनाश साबळे (3000 मी. स्टीपलचेस) या ऍथलेट्सनीच ऑलिम्पिक पात्रता मिळविली आहे. हा निर्णय घेण्यामागे कारण असेल असे विचारता नायर म्हणाले, ’कोव्हिड 19 परिस्थिती केव्हा निवळणार आणि टेनिंग सुरू करणार याबाबत कोणताच देश खात्रीने सांगू शकणार नाही. याशिवा पात्रतेसाठी दोन वर्षांचा कालावधी देणे हेही योग्य ठरणार नाही. कारण मे 2019 पासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. हा विचार करूनच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोन राष्ट्रीय स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. पण पात्रता रद्द केली असल्याने खेळाडू त्यात सर्वोत्तम प्रदर्शन करतील, असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.