उपासमार मिटविण्यासाठी झटणाऱया संस्थेचा गौरव
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेला नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला असून यावषी हा पुरस्कार जगातील उपासमारीच्या प्रश्नाविरुद्ध लढा देणाऱया संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ला (डब्ल्यूएफपी) देण्यात आला आहे. या पुरस्काराच्या शर्यतीत ग्रेटा थुनबर्गसह 300 हून अधिक नावे समाविष्ट होती. परंतु समितीने उपासमार मिटविण्यासाठी जागतिक पातळीवर राबविण्यात येणाऱया मोहिमेची दखल घेऊन हा पुरस्कार वरील संघटनेला घोषित केला आहे.
पुरस्कार जाहीर करताना नोबेल समितीने म्हटले आहे की, ज्या प्रकारे ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ उपासमारीच्या विरोधात एक मोठे युद्ध लढत आहे ते पाहता तो यास पात्र आहे. संघर्षामुळे प्रभावित भागात शांतता आणि युद्धाचे हत्यार म्हणून उपासमारीचा होणारा वापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांबद्दल समितीने त्यांचे कौतुक केले आहे. यावषीच्या पुरस्काराच्या माध्यमातून समिती जगाचे लक्ष अशा लाखो लोकांकडे वळवू इच्छित आहे, ज्यांना उपासमारीचा वा त्या धोक्याचा सामना करावा लागत आहे, असे समितीच्या अध्यक्षा ब्रेट रीस-अँडरसन यांनी म्हटले आहे. दरम्यान, ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’च्या प्रवक्त्यांनी हा एक अभिमानाचा क्षण असून मोठय़ा सिद्धीपेक्षा हे काही कमी नाही, असे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे.
‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ ही उपासमारीविरुद्ध लढा देणारी आणि अन्न सुरक्षेला चालना देणारी जगातील सर्वांत मोठी मानवतावादी संस्था आहे. 2019 मध्ये त्यांनी 88 देशांमधील सुमारे 100 दशलक्ष लोकांना मदत दिली. जगभरात आणीबाणीच्या परिस्थितीत विशेषत: यादवी आणि नैसर्गिक आपत्तींच्या प्रसंगी अन्नधान्य गरजूंपर्यंत पोहोचेल हे सुनिश्चित करणे हे त्यांचे कार्य आहे. भारतात वर्ल्ड फूड प्रोग्राम आता अन्नधान्याच्या बाबतीत थेट मदत देण्याऐवजी भारत सरकारला तांत्रिक साहाय्य आणि क्षमता निर्माण सेवा प्रदान करत आहे.