भारतीय मुष्टियुद्ध संघटनेची घोषणा, कोव्हिड-19 चे महासंकट त्यापूर्वीच शमण्याची अपेक्षा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यंदा वर्षअखेरीस नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात भारत आशियाई मुष्टियुद्ध चॅम्पियनशिप भरवणार असल्याचे भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनने सोमवारी जाहीर केले. ही स्पर्धा नेहमीप्रमाणे पुरुष व महिला अशा दोन्ही गटातून खेळवली जाईल. वर्षअखेरपर्यंत कोव्हिड-19 च्या महाप्रकोपावर आपण निश्चितपणाने विजय मिळवलेला असेल, अशी आशा आयोजकांनी यावेळी व्यक्त केली.
भारताने यापूर्वी 1980 मध्ये मुंबईत पुरुषांची आशियाई स्पर्धा भरवली तर 2003 मध्ये हिसार येथे महिलांची स्पर्धा भरवली होती. त्यानंतर गतवर्षी ही स्पर्धा दोन्ही गटातून एकत्रच खेळवण्यास सुरुवात झाली.
‘आशियाई मुष्टियुद्ध कॉन्फेडरेशनच्या बैठकीनंतर फेब्रुवारीमध्ये आम्हाला या स्पर्धेचे यजमानपद बहाल करण्यात आले होते. ही स्पर्धा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होईल, हे निश्चित आहे. फक्त ती कोणत्या शहरात खेळवायची, याचा निर्णय सर्व परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर घेण्यात येईल’, असे भारतीय मुष्टियुद्ध संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक आर. के. सचेती यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
‘सध्याची परिस्थिती अतिशय आव्हानात्मक आहे. पण, सर्व काही येत्या जून महिन्यापर्यंत आवाक्यात येईल आणि त्यानंतर उर्वरित कालावधीत स्पर्धेसाठी पूर्ण तयारी करता येईल’, असे ते पुढे म्हणाले. यापूर्वी ही स्पर्धा दोन वर्षातून एकदा भरवली जात होती. पण, अलीकडे ही स्पर्धा दरवर्षी होत आहे.
‘जानेवारीमध्ये या स्पर्धेच्या यजमानपदासाठी प्रस्ताव मागवले गेले होते. कोव्हिड-19 चा प्रकोप सरल्यावर, परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर आशियाई मुष्टियुद्ध कॉन्फेडरेशन यजमानपदाची अधिकृत घोषणा करेल’, असे सचेती पुढे म्हणाले.
‘परिस्थितीनुरुप आयोजनात लवचिक बदल करता यावेत, यासाठी आम्ही नोव्हेंबर-डिसेंबरची निवड केली आहे. ऑलिम्पिक पात्रता स्पर्धाही त्याच कालावधीत होत असल्याने त्याची रुपरेषा निश्चित झाल्यानंतर स्पर्धेचा पूर्ण कार्यक्रम आखता येईल. याच कारणामुळे ही स्पर्धा कोणत्या शहरात भरवायची, हे देखील आम्ही निश्चित केलेले नाही. त्यावेळी जी परिस्थिती असेल, ते पाहून निर्णय घेण्यात येईल’, याचा सचेती यांनी पुढे उल्लेख केला.
सध्या जागतिक स्तरावरील एकापेक्षा एक अशा अव्वल स्पर्धा देखील कोव्हिड-19 च्या प्रकोपामुळे रद्द कराव्या लागल्या आहेत आणि लांबणीवरही टाकाव्या लागल्या आहेत. या प्रकोपाने जगभरात 1 लाखापेक्षा अधिक लोकांचा बळी घेतला असून आतापर्यंत त्यावर कोणतीही लस उपलब्ध नाही. भारतात या प्रकोपामुळे बळी जाणाऱया व्यक्तींची संख्या 300 च्या वर गेली असून रोज पॉझिटिव्ह अहवालात भरच पडत असल्याचे दिसून येत आहे.
केंद्राने यापूर्वी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत आज (दि. 14) संपणे अपेक्षित होते. पण, सध्याची प्रतिकूल स्थिती पाहता, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. काही राज्यांनी यापूर्वीच लॉकडाऊन दि. 30 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुष्टियोद्धय़ांच्या सरावात खंड पडला आहे. शिवाय, प्रशिक्षकांना देखील ऑनलाईन टय़ुटोरियल्स व प्रशिक्षणावर अवलंबून रहावे लागत आहे, त्याचा सचेती यांनी येथे आवर्जून उल्लेख केला. एका वर्षाने लांबणीवर टाकले गेलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारताच्या 9 मुष्टिय़ोद्धय़ांनी पात्रता मिळवली असून त्यात 5 पुरुष व 4 महिलांचा समावेश आहे.