नियम मोडल्याप्रकरणी तब्बल सात लाख वाहनचालकांना दंड
प्रतिनिधी/पणजी
यावर्षी जानेवारी ते डिसेंबर महिन्यापर्यंत एकूण 2 हजार 103 वाहन अपघात झाले असून राज्याच्या विविध भागात झालेल्या अपघातामध्ये 198 जणांचा मृत्यू झाला आहे. 181 जण गंभीर जखमी झाले असून 630 जण किरकोळ जखमी झाले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया सुमारे 7 लाख वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी म्हणजे 2019 वर्षामध्ये झालेले अपघात तसेच अपघातांत मृत झालेल्यांच्या आकडेवारीची 2020 सालातील अपघातांशी किंवा मृतांशी तुलना केली असता 2020 सालात अपघातांची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे. कोविड19 महामारी मुळे राज्यात लॉकडाऊन जारी करण्यात आले होते. राज्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे वाहतूक तुरळक झाल्याने अपघातांची संख्या घटली, असे दिसून आले आहे.
वाहतूक नियमांचे पालन करा, पोलिसांचे आवाहन
कोणत्याही कारणामुळे वाहतूक तुरळक झाली असली तरी वाहतुकीचे नियम मोडणारे नियामांचे उल्लंघन करीतच असतात. 2020 डिसेंबर महिन्यापर्यंत वाहतुकीचे नियम मोडणाऱया वाहनचालकांवर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. संपूर्ण गोव्यात वर्षभरात तब्बल 7 लाख वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहनचालकाला दंड ठोठावला जातो, तसेच वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत समज दिली जाते. वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, या उद्देशाने पोलिसांनी ठराविक वेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱया वाहन चालकांविरोधात विशेष मोहीम राबविली होती.
‘नो एंट्री’मध्ये दोघांच्याही जीवाला धोका
नो एंट्री असलेल्या रस्त्यांतून जाणाऱया तब्बल 35 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. नो एंट्रीमधून वाहन चालवून जो नियमांचे उल्लंघन करतो त्याच्या जिवाला धोका असतोच, मात्र जो वाहनचालक नियमांचे पालन करून वाहन चालवितो, त्याच्याही जिवालाही धोका निर्माण करीत असतो, असे पोलिसांनी सांगितले.
आरसे नसलेल्या 40 हजार जणांना दंड
कुठल्याही वाहनाला व्यवस्थित आरसे असणे फार महत्वाचे असते. आरशातून वाहनचालक बाजूने जाणाऱया वाहनांना पाहून व्यवस्थितपणे ड्रायव्हिंग करू शकतो. काही वाहनचालक पॅशन म्हणून वाहनांचे आरसे काढून ठेवतात आणि अप्रत्यक्षपणे स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करून घेतात. वर्षभरात आरसे नसलेल्या तब्बल 40 हजार वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
नंबरप्लेटसाठी 28,500 जणांना दंड
प्रत्येक वाहनाला वाहतूक खात्याने दिलेली नंबर प्लेट व्यवस्थित असणे तितकेच महत्वाचे असते, काही वाहनांना नंबर प्लेट नसते तर काही वाहनांना पॅशनेबल नंबरप्लेट लावली जाते. जी व्यवस्थित वाचताही येत नाही. नंबर प्लेट नसलेल्या 7 हजार 500 वाहन चालकांना दंड देण्यात आला तर 21 हजार पॅशनेबल नंबरप्लेट असलेल्या वाहनचालकांना दंड ठोठावण्यात आला आहे.
युवकांच्या जीवावर येते हेल्मेट न वापरण्याची फॅशन
नो पार्किंगमध्ये वाहने ठेवणाऱया तब्बल 44 हजार वाहनचालकांना वर्षभरात दंड ठोठावण्यात आला आहे. दुचाकी स्वराने हेल्मेट वापरणे सक्तीचे केले असतानाही अधिकाधिक दुचाकी चालक हेल्मेटचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. एखाद्यावेळी अपघात झाल्यास केवळ हेल्मेट नसल्यामुळेच वाहनचालकाचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. सर्वकाही माहिती असतानाही केवळ जीवाची मजा म्हणून हेल्मेटचा वापर केला जात नाही यात अधिकाधिक युवकांचा समावेश आहे. वर्षभरात तब्बल 2 लाख 81 दुचाकी चालकांना हेल्मेट नसल्यामुळे दंड ठोठावण्यात आला आहे.