अनेक खून प्रकरणांचा तपास रखडलेलाच : पोलीस यंत्रणा सुस्तावलेली, कुटुंबीयांचे मानसिक खच्चीकरण
प्रतिनिधी /बेळगाव
एखाद्या खून प्रकरणानंतर तातडीने त्याचा तपास लागला नाही तर अनेक वर्षे तपास रखडतो. काही वेळा तर तपास अधिकारी हतबल ठरतात. खून कोणी व कशासाठी केला? याचा उलगडा होत नाही. अशावेळेला खुनी निर्भयपणे समाजात वावरतात. बेळगाव परिसरात अशा अनेक खुनांचा तपास लागलेला नाही. पोलीस यंत्रणा कोरोनामुळे आलेली मरगळ झटकून कामाला लागण्याच्या मनःस्थितीत नाही.
26 नोव्हेंबर 2020 रोजी कबलापूर, ता. बेळगावजवळ निशिकांत सुभाषराव दहीकांबळे (वय 31, मूळचा राहणार उदगीर, जिल्हा लातूर) या खासगी कंपनीत काम करणाऱया युवकाचा मृतदेह आढळून आला होता. 25 नोव्हेंबर रोजी त्याचे अपहरण करण्यात आले होते. यासंबंधी मारिहाळ पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील महिन्यात या खुनाला एक वर्ष पूर्ण होते. अद्याप निशिकांतचा खुनी कोण? याचा उलगडा झालेला नाही.
एखाद्या खुनाच्या तपासाला किती अवधी लागतो? असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जातो. पोलीस अधिकाऱयांसाठी एखादे खून प्रकरण हे फक्त ‘प्रकरण’ असते. पण, ज्याच्या घरातील माणूस दगावलेला असतो, त्याच्या आठवणीने ते रोज मरत असतात. खून कोणी केला? कशासाठी झाला? याचा उलगडा झाला नाही तर त्यांची अवस्था आणखी बिकट होते. या चिंतेनेच त्यांना दिवस कंठावे लागतात.
सध्या उदगीर, जिल्हा लातूर येथील निशिकांतच्या कुटुंबीयांवर ही वेळ आली आहे. निशिकांतचे भाऊ रजनीकांत दहीकांबळे सातत्याने मारिहाळ पोलिसांच्या संपर्कात आहेत. ‘साहेब, आमच्या भावाचा खून कोणी केला? काही माहिती मिळाली का?’ अशी विचारणा करीत असतात. ‘आम्ही आमचे प्रयत्न केलेले आहेत. आता तुम्हीच कोणावर संशय आहे तर सांगा, पुढचे बघू’ असे तपास अधिकारी त्यांना सांगत आहेत. पोलीस अधिकाऱयांच्या पठडीतील उत्तराने रजनीकांत व त्यांचे कुटुंबीय पार कंटाळले आहेत.
‘आम्ही उदगीरला असतो. कोरोनामुळे एका राज्यातून दुसऱया राज्यात जाण्यासाठी अनेक नियम आहेत. आम्हाला लवकरच बेळगावला पोहोचता येत नाही. नोकरीनिमित्त बेळगावला आलेल्या भावाचा खून कोणी केला? याचा उलगडा होईना. या चिंतेने आई सैरभैर झाली आहे. आम्हा दलित कुटुंबीयांना न्याय मिळेना. पोलीस आयुक्त कार्यालयासमोर धरणे धरण्याचा कार्यक्रम आखला होता. मात्र, आम्हा सर्वांना पोहोचता येईना, याचाच फायदा पोलीस घेत आहेत’, असा आरोप त्यांनी केला.
3 डिसेंबर 2020 रोजी निशिकांतच्या कुटुंबीयांनी पोलीस अधिकाऱयांची भेट घेऊन त्यांना आपली जबानी दिली आहे. लवकरात लवकर गुन्हेगारांच्या मुसक्मया आवळू, असे आश्वासन देण्यात आले होते. एक वर्ष पूर्ण व्हायला आले तरी अद्याप तपासात प्रगती नाही. या प्रकरणाचा छडा लावावा यासाठी उदगीर, लातूरसह महाराष्ट्रातील विविध भागात दलित संघटनांनी यापूर्वी आंदोलन छेडले आहे. मात्र, बेळगाव पोलिसांवर याचा कसलाच परिणाम होईना.
निशिकांतचा खून झाला, त्याच्या एक महिना आधी काकती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील सोनट्टीजवळ एका रखवालदाराचा खून झाला होता. 28 ऑक्टोबर 2020 रोजी लक्ष्मण नानाप्पा हुलगण्णावर (वय 45) मूळचा राहणार हण्णीकेरी, ता. बैलहोंगल याचा तो रहात असलेल्या फार्महाऊसवर अज्ञातांनी खून केला होता. सोनट्टीजवळील एका फार्महाऊसवर रखवालदार म्हणून तो काम करत होता. या खुनालाही एक वर्ष पूर्ण होते, तरी खुनी कोण? याचा तपास लागलेला नाही.
अद्याप उलगडा नाही
सध्याची परिस्थिती लक्षात घेता निशिकांत असो वा लक्ष्मण अशा अनेकांची खून प्रकरणे तपासाविना पोलीस स्थानकात पडून आहेत. विद्यानगर, अनगोळ येथील गगन सोमनाचे (वय 10) या घरासमोर खेळणाऱया बालकाचा खून करून त्याचा मृतदेह त्याच्याच घरासमोरील विहिरीत टाकून देण्यात आला होता. या प्रकरणाच्या तपासासाठी तर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयापर्यंत दाद मागितली. हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याची मागणी करण्यात आली आहे. गगनचा खून कोणी व कशासाठी केला? याचा अद्याप उलगडा झाला नाही. खुनानंतर सुरुवातीलाच तपासाला योग्य दिशा मिळाली नाही तर नंतरच्या काळात तपास कसा भरकटतो? याची उदाहरणे अनेक आहेत. काही प्रकरणात पोलिसांनी प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही तर काही प्रकरणात तपास अधिकारी केवळ दिखावा करत असतात, कामचुकारपणा करत असतात. तपासासाठी साधे प्रयत्नही केले जात नाहीत. अशा परिस्थितीमुळे ज्यांचा खून झाला आहे, त्यांचे कुटुंबीय रोज मरत आहेत तर खुनी उजळ माथ्याने फिरत आहेत.
तंत्रज्ञानाची मदत आवश्यक…
गेल्या महिन्यात आंतरधर्मीय प्रेमप्रकरणाच्या विरोधातून अरबाज मुल्ला (वय 24) या तरुणाचा भीषण खून करून त्याचा मृतदेह खानापूर रेल्वेपुलाजवळ रेल्वेरूळावर टाकण्यात आला होता. बेळगाव जिल्हा पोलिसांनी तत्परतेने तपास हाती घेऊन दहा जणांच्या मुसक्मया आवळल्या. या प्रकरणात तंत्रज्ञानाची मदत घेण्यात आली. निशिकांत दहीकांबळे खून प्रकरणातही तंत्रज्ञानाची मदत घेता आली असती. मात्र, पोलिसांनी म्हणावे तसे प्रयत्न केले नाहीत, असे दिसून येते. निशिकांतच्या मोबाईलमधून त्यावेळी अंजनेयनगर परिसरात राहणाऱया त्याच्या पत्नीला दोन मेसेज आले होते. या मेसेजमध्ये दोघा जणांची नावे होती. पोलिसांनी त्यांची चौकशी केली, त्यांचा सहभाग नाही म्हणून त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर तर सोडा, या प्रकरणाच्या तपासालाच हात लावण्यात आलेला नाही.