थोडय़ाच दिवसात 2021 वर्ष प्रत्येकाच्या आयुष्यातून कायमचे निघून गेलेले असेल. प्रत्येकजण गेलेल्या वर्षाचा आढावा घेताना पुढील वर्ष मागील वर्षापेक्षा चांगले कसे जगता येईल याचा विचार करून काही सुधारणा करण्यासाठी जीवनामध्ये बदल घडविण्याचा निश्चय करतील. पण पुन्हा दुर्दैवाने हेही वर्ष असेच निघून जाईल आणि बघता बघता आपले आयुष्यही असेच निघून जाईल. या परम सत्याची जाणीव आपल्याला आपले वैदिक ग्रंथ आणि त्यानुसार समाजाला आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे साधू संत करून देतात. मनुष्य जीवन हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि या जीवनातील गेलेला प्रत्येक क्षण आपण काही केल्या परत आणू शकत नाही याची जाणीव ठेवून प्रत्येकाने वागले पाहिजे. नीतिशास्त्रामध्ये सांगितले आहे आयुषः क्षण एकोपि सर्वरत्नैर्न लभ्यते । नीयते तद् वृथा येन प्रमादः सुमहानहो।अर्थात सर्व संपत्ती देऊनसुद्धा जीवनातील गेलेला एक क्षण कोणी परत मिळवू शकत नाही, जर असा क्षण जो कोणी निरर्थक वाया घालवत असेल तर तो आयुष्याचे किती मोठे आणि न भरून येणारे नुकसान करून घेत आहे. यासाठी आपल्या आयुष्यातील वेळ कसा वाया जातो ते समजावून देताना आणि वेळेचा उपयोग कसा करावा यासाठी मार्गदर्शन करताना श्रीमद भागवतमध्ये प्रल्हाद महाराज म्हणतात, (भा 7.6.6) पुंसो वर्षशतं ह्यायुस्तदर्धं चाजितात्मनः । निष्फलं यदसौ रात्र्यां शेते।़न्धं प्रापितस्तमः । अर्थात प्रत्येक मनुष्याचे अधिकतम आयुष्य शंभर वर्षाचे असते. पण इंद्रियनिग्रह न करणाऱया मनुष्याचे अर्धे आयुष्य पूर्णपणे व्यर्थ जाते, कारण तो अज्ञानाच्या प्रभावाखाली निशासमयी बारा तास झोपून कालापव्यय करतो. म्हणून अशा मनुष्याचे आयुष्य खऱया अर्थाने पन्नास वर्षेच असते. मुग्धस्य बाल्ये कैशोरे क्रीडतो याति विंशतिः । जरया ग्रस्तदेहस्य यात्यकल्पस्य विंशतिः ।अर्थात ‘मनुष्याची बालपणी भ्रमितावस्थेत दहा वर्षे व्यतित होतात. त्याचप्रमाणे किशोर वयात तो क्रीडा करण्यामध्ये आणखी दहा वर्षे व्यर्थ घालवितो. अशा प्रकारे त्याची वीस वर्षे निष्फळ जातात. पुढे वृद्धावस्थेत अगदी भौतिक कार्येदेखील करण्याचे सामर्थ्य नसलेला तो अशक्तपणामुळे आणखी वीस वर्षे व्यर्थ घालवितो.’
यासाठी जीवनाच्या सुरुवातीपासूनच आदर्श ब्रह्मचारी जीवन जगण्याचे अर्थात मनुष्यजन्माचे ध्येय आपण आत्मा आहे हे जाणून त्याप्रमाणे वागण्याचे प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे. त्यानंतर गृहस्थाश्रमामध्ये त्याला नियामक तत्त्वाचे पालन करून इंद्रियनिग्रह करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले पाहिजे. त्यानंतर उरलेल्या आयुष्यात व्यक्ती जीवनाच्या अंतिम ध्येयाकडे अनासक्तपणे वाटचाल करू शकतो. ( भा7.6.1). कौमार आचरेत्प्राज्ञो धर्मान्भागवतानिह । दुर्लभं मानुषं जन्म तदप्यध्रुवमर्थदम् ।अर्थात ‘जो मनुष्य खऱया अर्थाने बुद्धिवान आहे त्याने जीवनाच्या अगदी प्रारंभापासूनच अर्थात कौमार्यावस्थेपासूनच मानवी देहाचा उपयोग भक्तिमय सेवेच्या आचरणासाठी करावा आणि असे करीत असताना इतर सर्व अनावश्यक कार्याचा त्याग करावा. मानवी देह अत्यंत दुर्लभ आहे आणि जरी तो इतर देहांप्रमाणेच क्षणभंगुर असला तरी अर्थपूर्ण आहे, कारण मानवी देहाच्या साहाय्याने भक्तिमय सेवा करू शकतो. मनुष्याने केलेली अगदी अत्यल्प भक्तिमय सेवादेखील त्याला सर्वोच्च पूर्णत्व प्रदान करू शकते.’
अशाच आशयाचा उपदेश अर्थातच श्रीमद भागवतच्या आधारावर संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून देत आहेत. बाळपणीं ऐसी वर्षे गेली बारा । खेळतां या पोरं नाना मतें ।।1।। विटी दांडू चेंडू लगोऱया वाघोडी । चांपे पेड घडी एकीबेकी ।।2।। हमामा हुंबरी पकव्याच्या बारे । खेळे जंगी भोवरे चुंबाचुंबी ।।3।। सेलडेरा आणि निसरभोवंडी । उचली बाळे धोंडी अंगबाळे ।।4।। तुका म्हणे ऐसे बाळपण गेले । मग तारुण्य आले गर्वमुळं ।।5।। अर्थात ‘विटीदांडू, चेंडू, लगोऱया, वाघोडय़ा, चंपी, एकीबेकी, पेंडघडी इत्यादी खेळ खेळण्यात लहानपणाची बारा वर्षे जातात. त्यात हमामा, हुंबरी, पकव्याची बारे, मोठे भोवरे, शिवाशिवी असे खेळ असतात. बालपणाचे वय खेळ खेळण्यात गेल्यावर गर्वाचे मूळ असे तारुण्य पुढे येते. तारुण्याच्या मदे न मानी कोणासी । सदा मुसमुशी घुळी जैसा ।। 1।। अठोनी वेठोनी बांधिला मुंडासा । फिरतसे म्हैसा जनामधी ।।2।। हाती दिडपानं वरती करी मान । नाही तो सन्मान भालियांसी ।।3।। श्वानाचिया परी हिंडे दारोदारी । पाहे परनारी पापदृष्टी ।।4।। तुका म्हणे ऐसी थोर हानी जाली । करितां टवाळी जन्म गेला ।।5।। अर्थात तरुण मनुष्य उन्मत्त होऊन कोणाचाही मान ठेवत नाही, माजलेल्या बैलाप्रमाणे सदासर्वकाळ मुसमुसत असतो. घट्ट पागोटे बांधून माजलेल्या रेडय़ाप्रमाणे तो लोकांमध्ये फिरत असतो. हातामध्ये विडय़ाचे एक पान असते, पण मान मात्र ताठय़ाने वर करून चालतो, कोणी ज्ये÷, सन्माननीय लोक समोर आले तरी त्यांची दखल घेत नाही. कुत्र्याप्रमाणे लोकांच्या दारोदार हिंडतो आणि दुसऱयांच्या स्त्रियांकडे पापदृष्टीने निरखून पाहतो अशा माणसाच्या साऱया आयुष्याची हानी होते, कारण तो आपले आयुष्य दुसऱयांची टवाळी करण्यात घालवतो. म्हातारपणी थेटे पडसे खोकला । हात कपाळाला लावून बैसे ।।1।। खोबरियाची वाटी जाले असे मुख । गळतसे नाक श्लेष्मापुरी ।।2।। बोलो जाता शब्द नयेची हा नीट । गडगडी कंठ कफ भारी ।।3।। शेजारी म्हणती मरेना कां मेला । आणिला कांटाळा येणे आम्हा ।।4।। तुका म्हणे आतां सांडूनि सर्व काम । स्मरा राम राम क्षणक्षणा ।।5।। अर्थात ‘मनुष्य म्हातारा झाला की थंडी, पडसे, खोकला इत्यादी रोग होतात, म्हणून मनुष्य कपाळाला हात लावून काळजी करीत बसतो. तुकाराम महाराज म्हणतात, म्हातारपणी अशी फजिती होईल हे जाणून, सर्व कामातून मुक्त होऊन प्रत्येक क्षणी रामनाम स्मरण करा.
आणखी एका अभंगात आपल्या आयुष्यातील दिवस कसे नकळत पळतात आणि बघता बघता आपण मृत्यूच्या जवळ येऊन पोचतो याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, गेले पळाले दिवस रोज। काय म्हणतोसी माझे माझे ।।1।। सळे धरोनिया बैसला काळ । फांकों नेदी घटिका पळ ।।2।। कां रे अद्यापि न कळे । केश फिरले कान डोळे ।।3।। हित कळोनि असतां हाती । तोंडी पाडोनी घेसी माती ।।4।। तुज ठाऊके मी जाणार । पाया शोधोनी बांधीसी घर ।।5।। तुका म्हणे वेगे । पंढरिराया शरण रिघे ।।6।। अर्थात अरे तुझ्या आयुष्याचे दिवस गेले, पळाले! अजून तू माझे माझे काय म्हणतोस? मनात तुझ्याशिवाय डुक धरून काळ बसला आहे तो तुझा अखेरीस घटकाभर किंवा पळभरदेखील उसंत देणार नाही. अरे तुझे केस तुला सोडून गेले, तुझे डोळे, कान तुझे काही ऐकेनासे झाले, आपला देह जाणार हे तुला माहिती आहे तरी नव्या उमेदीने घर बांधतोस, पाया खोल खोल खणतोस याला काय म्हणावे? अरे तू लवकरात लवकर पंढरीरायाला शरण जा.
– वृंदावनदास