प्रतिनिधी / नागठाणे :
वळसे (ता. सातारा) येथे शनिवारी दुपारी शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत जवळपास ५० एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. या घटनेचा गावातील ३० शेतकऱ्यांचा फटका बसला आहे.
शनिवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास वळसे येथील नारगौंडी शिवारातील विहिरीजवळ शॉर्ट सर्किटने आग लागली. काही मिनिटांतच या आगीने उग्र रुप धारण केले. या क्षेत्रात गावातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. आगीची झळ जवळपास येथील ३० शेतकऱ्यांना बसली. या शेतकऱ्यांचा ५० एकर क्षेत्रातील ऊस जागेवरच जळून खाक झाला.
घटनेची माहिती मिळताच शेंद्रे (शाहूनगर) येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाला. मात्र वाऱ्यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. त्यातच अग्निशमन बंबास शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता न मिळाल्यामुळे मदतकार्यात अडथळे आले. त्यामुळे हानी आणखीच वाढत राहिली. या घटनेत सुमारे ८० लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असण्याची शक्यता शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचे स्पष्ट झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.