उचगाव /वार्ताहर
वळिवडे (ता. करवीर) येथे आमच्या शेतांमध्ये का आलास या कारणावरून एकाला मारहाण करून जखमी करण्यात आले. विजयपाल बाबुराव चौगुले ( वय 32 रा. हरोली तालुका शिरोळ जि.कोल्हापूर ) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी गांधीनगर पोलीसांत मच्छिंद्र रामचंद्र गोळे, नागेंद्र रामचंद्र गोळे, जालिंदर रामचंद्र गोळे, वैभव नागेंद्र गोळे सर्व रा. वळिवडे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.
वळीवडे गावच्या हद्दीत गट नंबर २१७ अ/२/३/४ ०.२७ आर क्षेत्र विजयपाल चौगुले यांच्या नावावर आहे. मात्र याबाबत चौगुले व गोळे यांच्यामध्ये जमिनीवरून वाद असून दिवाणी न्यायालय कोल्हापूर व उच्च न्यायालय मुंबई याठिकाणी याबाबत सुनावणी झाली आहे. विजय चौगुले हे आपल्या शेतात गेले असता मच्छिंद्र गोळे, नागेंद्र गोळे, जालिंदर गोळे व वैभव गोळे यांनी हे तुझे रान नाही तू शेतातून बाहेर हो असे म्हणून शिवागीळ करुन चौगुले यांना काठीने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी गांधीनगर पोलिसात गुन्हा नोंद झाला असून चौघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली. अधिक तपास पो.ना. कुंभार करीत आहेत.