बेळगाव
शहर आणि परिसराला मंगळवारी दुपारी जोरदार वळीवसरींनी झोडपून काढले. वळिवाच्या सततच्या हजेरीने शहर परिसरातील उष्म्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ठिकठिकाणी झाडे पडून विद्युततारा तुटून पडल्याने बऱयाच काळापर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाला होता.
गेल्या दोन दिवसांपासून उष्म्यामध्ये वाढ झाली होती. मंगळवारी सकाळपासूनच उकाडा होता. पाऊस पडेल अशी शक्यता होती. दुपारी 4 च्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पावसाचे आगमन झाले. शहरासह ग्रामीण भागात हा पाऊस झाला. या पावसामुळे काहीवेळ हवेत गारवा निर्माण झाला होता.
सध्या कोरोनामुळे शहरातील व्यवहार ठप्प झाले आहेत. पोलीस मात्र दिवसभर बंदोबस्तात व्यस्त आहेत. त्यांना या पावसाचा त्रास सहन करावा लागला. या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून होते. काही ठिकाणी गटारींचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. सध्या शहरामध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी खोदाई करण्यात आली आहे. त्यामध्ये या पावसाचे पाणी तुंबून होते. तर पावसामुळे काही ठिकाणी चिखल झाला होता.
शहराबरोबरच ग्रामीण भागामध्येही पाऊस झाला आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतला आहे. शेतकऱयाला पावसाची गरज होती. त्यामुळे हा पाऊस फायद्याचा ठरला आहे.
झाडे पडून वाहतुकीत व्यत्यय
शहराच्या विविध भागात झाडे पडून वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाल्याचे प्रकार घडले आहेत. प्रामुख्याने बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर झाडे पडून वाहतुकीचा खोळंबा झाला.