उचगांव / वार्ताहर
करवीर तालुक्यातील वळीवडे ग्रामपंचायतीची ‘माझी वसुंधरा’ अभियानासाठी निवड झाली आहे. या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचा प्रारंभ सरपंच अनिल पंढरे, उपसरपंच सुषमा शिंगे, ग्रामविकास अधिकारी बी. डी. पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते झाला. करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी व वळीवडे या दोन गावांचीच या अभियानासाठी निवड झाली आहे.
अनियमित पाऊस, वादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी व कोरोनासारख्या महामारीच्या उच्चाटनासाठी निसर्गपूरक उपाययोजना व पर्यावरण रक्षणासाठी कृती योजना या अभियानांतर्गत करण्यात येणार आहे. 31 मार्च 2021 अखेर हे अभियान राबविण्यात येईल. घनकचरा व्यवस्थापन, ओल्या कचऱ्यातून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्लास्टिक संकलन केंद्र, सांडपाणी व्यवस्थापन करण्यात येणार असून वनसंपदा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत कार्यालय व शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प राबवून विजेबाबत त्या स्वावलंबी बनवण्यात येणार आहेत. रेन हार्वेस्टिंग व कूपनलिका पुनर्भरणवर जोर देण्यात येणार आहे. अमृत वननिर्मिती करून वृक्षलागवड पार्क तयार करण्याचा या अभियानात समावेश करण्यात आला आहे. या अभियानास ग्रामस्वच्छतेने प्रारंभ करण्यात आला. त्यात सर्व ग्रामपंचायत सदस्य व स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
ग्रामपंचायतीने लोकसहभागातून ग्रामविकास साधला असून शासनाचे विविध पुरस्कार या ग्रामपंचायतीने मिळवले आहेत. या पुढे ही लोकसहभागातून ग्रामविकास करण्यात येईल, असे सरपंच अनिल पंढरे व ग्रामविकास अधिकारी बी डी पाटील यांनी यावेळी सांगितले.