प्रतिनिधी / बेळगाव
महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या अर्थसाहाय्य योजनेंतर्गत वसंत व्याख्यानमालेतर्फे सोमवारी दुपारी सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत तरुण भारतच्या पत्रकार मनीषा सुभेदार यांनी मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, बातमी म्हणजे काय? याच्या अनेक व्याख्या आहेत. तथापि, ज्याच्यामध्ये ‘मी’ कमी व बात जास्त आहे ती बातमी होय. बातमी परिपूर्ण करण्यासाठी अचूक, मोजकी व स्पष्ट असावी, ‘अल्पवाक्मयम् बहुसारम्’ हे बातमीचे महत्त्वाचे सूत्र आहे. बातमी करताना का, कधी, कोठे, कसे, कोणी, केव्हा या सहा ‘क’कारांची उत्तरे दिली
पाहिजेत.
तानीबाई बिर्जे या मराठी पत्रकारितेतील पहिल्या महिला असून त्यांनी काहीकाळ दीनबंधू वृत्तपत्र चालविले. त्यांचा बेळगावशी संबंध होता, असे सांगून त्यांनी आपले अनुभवकथन केले. समाजाचे हीत हाच बातमीचा उद्देश असायला हवा. पत्रकाराने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सतत प्रशंसाच नव्हे तर रोष आणि टीकासुद्धा त्याला स्वीकारता यायला हवी. जातीय तेढ वाढविणारे किंवा कोणाच्याही वैयक्तिक जीवनाला बाधक ठरेल, असे वृत्त देऊ नये. त्यामुळे काय लिहावे यापेक्षा काय लिहू नये, हे पत्रकाराला समजणे आवश्यक आहे, असे त्या
म्हणाल्या.
प्रारंभी शिल्पा लांडगे यांनी ईशस्तवन सादर केले. व्याख्यानमालेच्या अध्यक्षा मीना खानोलकर यांनी वक्त्यांचा सत्कार केला. उपाध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी प्रास्ताविक केले. परिचय करून देऊन प्रियांका केळकर यांनी सूत्रसंचालन केले. दीपा देशपांडे यांनी आभार मानले.