जिल्हा पंचायतच्या मुख्य योजना अधिकाऱयांची पीडीओंना सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील 2016-17 पासूनच्या वसती योजनांची कामे अजूनही अर्धवट राहिली आहेत. ती पूर्ण करण्याकडे साफ दुर्लक्ष झाले असून पीडीओंनी ती तातडीने पूर्ण करावीत, अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य योजना अधिकारी प्रकाश वड्डर यांनी केली.
तालुका पंचायतीच्या सभागृहात नुकतीच त्यांनी बैठक घेतली. यावेळी तालुका पंचायतीचे नोडल अधिकारी श्रीधर सरदार उपस्थित होते. मागील चार-पाच वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजना व बसव वसती योजनेंतून सुमारे 2 हजारांहून अधिक घरे मंजूर झाली आहेत. मात्र, केवळ 900 घरांचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे वसती योजनांची कामे कधी पूर्ण होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
वसती योजनेतील घरांचा लाभ मिळवून घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. घर सापडेपर्यंत जीवाचे रान करण्यात येते. मात्र, ते मिळाल्यानंतर पूर्ण करून घेण्याकडे अनेकांचे साफ दुर्लक्ष होत आहे. बेळगाव तालुक्मयातील घरांची मान्यता आता रद्द होण्याच्या मार्गावर आहे. 2010-11 पासून आतापर्यंत ज्यांना घरे मंजूर झाली आहेत, त्यामधील अजूनही घरांचे काम पूर्ण केले नाही. याला पीडीओच जबाबदार असून ती कामे पूर्ण करण्याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशा सूचनाही प्रकाश यांनी केल्या.
सध्या ज्यांची घरे अर्धवट आहेत आणि ज्यांनी अजूनही घराच्या कामाला सुरुवात केली नाही त्यांनी त्या कामाला चालना द्यावी. संबंधित ग्राम पंचायतमध्ये भेटून कागदपत्रे दिली नाहीत तर ती घरे रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे लवकरात लवकर संबंधित लाभार्थ्यांनी कामे पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
मागील पाच-सहा वर्षांपासून वसती योजनांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. काही वेळा केंद्र सरकारकडून निधी आला नाही म्हणून तर काही वेळा संबंधित ग्राम पंचायत व अधिकाऱयांच्या दुर्लक्षामुळे ही कामे अर्धवट स्थितीत राहिली आहेत. लवकरच याबाबत गांभीर्याने विचार करून तातडीने घरांची कामे पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले.