सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष, विश्वेश्वरय्या नगरमधील क्वॉर्टर्स परिसरात झाडा-झुडपांची वाढ : पोलीस क्वॉर्टर्समधील केवळ रस्त्यांचा विकास-विश्रामगृहाचे सुशोभिकरण
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील काही महत्त्वाच्या राज्यमार्गाच्या देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. तसेच सरकारी विश्रामधामासह सरकारी कर्मचाऱयांच्या क्वॉर्टर्सची देखभाल या विभागाकडून केली जाते. पण विश्वेश्वरय्या नगर येथील क्वॉर्टर्स परिसरात झाडे-झुडपे वाढली असल्याने या ठिकाणी आता कर्मचाऱयांऐवजी साप-किडय़ांचे वास्तव्य वाढले आहे.
विश्वेश्वरय्या नगर परिसरात सार्वजनिक बांधकाम खात्याचे क्वॉर्टर्स आहेत. महापालिका, बुडा, जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायत, पोलीस खाते आणि सार्वजनिक बांधकाम खाते अशा विविध सरकारी कार्यालयातील मुख्याधिकाऱयांचे बंगले या परिसरात आहेत. तसेच द्वितीय श्रेणी कर्मचाऱयांना राहण्यासाठी क्वार्टर्सची उभारणी करण्यात आली आहे. सदाशिवनगरला जाणाऱया रस्त्याशेजारी या इमारती उभारण्यात आल्या आहेत. या इमारतीसह, विविध राज्य मार्ग आणि सरकारी विश्रामगृहाची देखभाल करण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. कॅम्प आणि पोलीस आयुक्त कार्यालयाशेजारी असलेल्या पोलीस क्वॉर्टर्सची देखभाल देखील सार्वजनिक बांधकाम खात्याची आहे. पण रस्त्यांचा विकास आणि किल्ला परिसरातील सरकारी विश्रामगृहाच्या सुशोभिकरणा व्यतिरिक्त कोणताच विकास सार्वजनिक बांधकाम विभाग करीत नसल्याची बाब चव्हाटय़ावर आली आहे.
कर्मचाऱयांसाठी असलेल्या क्वॉर्टर्सची दुरवस्था
विश्वेश्वरय्या नगर येथे कर्मचाऱयांसाठी असलेल्या क्वॉर्टर्सची दुरवस्था झाली आहे. काही क्वॉर्टर्सला गळती लागली असल्याने पावसाळय़ात राहताना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच परिसरातील तीन क्वॉर्टर्स बंद अवस्थेत असून दरवाजे व खिडक्मया मोडकळीस आल्या आहेत. क्वॉर्टर्स परिसरात गवत, झाडे-झुडपे वाढली आहेत. यामुळे या क्वॉर्टर्समध्ये आता सरकारी कर्मचाऱयांऐवजी साप-किडय़ांचे वास्तव्य आहे. इमारतीची देखभाल करण्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे साफ दुर्लक्ष झाले आहे. बंद असलेल्या क्वार्टर्समध्ये गैरप्रकार चालत असल्याची चर्चा आहे. केवळ प्रथम श्रेणीतील अधिकाऱयांच्या बंगल्याची देखभाल करण्यासाठी निधी खर्च केला जातो. पण कर्मचाऱयांना कोणत्याच सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत.
स्वमालकीच्या इमारतींचा विकास करण्याकडे दुर्लक्ष
अधिवेशन काळात सरकारी विश्रामगृह आणि विविध हॉटेल्स बुक केली जातात. याकरिता मोठय़ाप्रमाणात खर्च केला जातो. तसेच विविध सरकारी कार्यालयांकरिता स्वतःची जागा नसल्याने भाडेतत्त्वावरील इमारतींमध्ये कार्यालय सुरू करण्यात येते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याने क्वॉर्टर्स देखभाल करून किंवा दुरूस्ती करून सरकारी कार्यालयाकरिता इमारतीचा उपयोग होवू शकतो.
तसेच अधिवेशन काळात येथील इमारतीचा वापर करता येऊ शकतो. पण सार्वजनिक बांधकाम खात्याचे याकडे दुर्लक्ष झाले असल्याने इमारतींची दुरवस्था झाली आहे. विकास करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे स्वमालकीच्या इमारतींचा विकास करण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.