वांगी / वार्ताहर
महावितरणने विजबिले दुरुस्त करुन शेतकऱ्यांना आकारणी मान्य झाली तरच विजबील भरणार अन्यथा रुपायासुध्दा भरणार नाही असे विज अभ्यासक श्रीदास होनमाने यांनी वांगी (ता.कडेगांव) येथे रास्ता रोको केलेल्या आक्रमक शेतकऱ्यांसमोर महावितरण अधिकाऱ्यांना सुनावले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, महावितरण कंपनीमध्ये स्वतःच्या स्वार्थापोटी शेतकऱ्याला चुकीची व बेकायदेशीर मोठ्या रकमेची बिले देऊन शेतकऱ्यांकडून हुकूमशाही पद्धतीने वसूल करून घेत आहेत. गेले बरेच वर्ष झाले शेतीपंपाचे मीटरचे रीडिंग घेतले नाही व त्यांची बिले ऑफिसमध्ये बसून चुकीच्या पद्धतीने अपडेट केली आहेत.आजवरची बिले अंदाजे,मनमानी व बोगस आहेत. शेतकऱ्याला ट्रान्सफॉर्मर बंद करण्याची भिती घालून वसुली चालू आहे.
शेती पंपाची वसुली करण्यासाठी सर्रास ट्रान्सफॉर्मर बंद करण्याचे सत्र अवलंबून वांगीतील शेतीचे प्रचंड नुकसान होऊ लागले आहे. महावितरणचे अधिकारी कायद्याचे उल्लंघन करून करीत आहेत अनेक शेतकऱ्यांनी बिल दुरुस्ती चे अर्ज महावितरण कंपनीकडे केली आहेत. वास्तविक सर्व शेतकऱ्यांची बिले दुरुस्त करून नविन बिल देणे गरजेचे होते.जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत कोणतीही कारवाई त्याच्यावरती करायची नाही.असा नियम आहे.या अन्यायाविरोधात महावितरणला जाब विचारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी संघटित होऊन अचानक रास्तारोको आंदोलन सुरु केले होते.
दरम्यान दोन तास शंभरवर शेतकरी रस्त्यावर बसून होते.वाहतूक ठप्प झाली होती.याची माहिती मिळताच चिंचणी(वांगी) चे स.पो.नि.संदिप साळुंखे तात्काळ हजर झाले. महावितरणचे अधिकारी अजय काशिद यांना बोलावून तोडगा काढला.त्यानुसार चार दिवसात कँप घेऊन सर्व शेतकऱ्यांची विजबिले दुरुस्त करुन दिली जातील.तसेच बंद केलेले ट्रान्सफॉर्मर त्वरीत सुरु करण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिली व रास्ता रोको स्थगित झाला.यावेळी सरपंच डॉ.विजय होनमाने,उपसरपंच धनाजी सुर्यवंशी,माजी उपसरपंच बाबासो सुर्यवंशी,संजय कदम,काशिनाथ तांदळे,राजेश गायगवाळे,मुरलीधर बनसोडे(देवराष्ट्रे),संतोष मोकळे,राजेंद्र मोहिते, कृष्णत मोकळे, जितेंद्र वाघमोडे, हौसेराव माळी, रमेश मोहिते, रामभाऊ देशमुख, भूपाल मोहिते, जयराम महाडिक यांचेसह शेतकरी उपस्थित होते.