मुंबई – मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वांद्रे स्थानकाबाहेर हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय या ठिकाणी जमले होते. या प्रकरणानंतर पोलिसांनी १००० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. तसंच पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. तसंच सोशल मीडियाद्वारे ट्रेन सोडण्याची अफवा पसरवणाऱ्या ३० अकाऊंट्सची ओळख पटवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
महाराष्ट्र पोलिसांची सायबर टीम फेसबुक, ट्विटर, टिक-टॉक, इन्स्टाग्राम आणि यांसारख्या इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पसरणाऱ्या खोट्या बातम्यांवर नजर ठेवून आहे. जर एखाद्या व्यक्तीनं सोशल मीडियाचा वापर करून अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला तर सायबर टीमकडून त्यांचं लोकेशन ट्रेस करण्यात येतं. तसंच त्याची माहिती जिल्हा पोलिसांना देऊन संबंधितांविरोधात कायद्याप्रमाणे करण्यात येत असल्याची माहितीही पोलिसांकडून देण्यात आली.
वांद्र्यातील अफवा पसरवणाऱ्यांची ओळख पटली
वांद्रे येथील जमाव एकत्र येण्यास जबाबदार असलेल्या व्यक्तींची ओळख पटली असून त्याबाबत मुंबई पोलिसांनाही माहिती देण्यात आली आहे. रेल्वे सेवांविषयी अफवा पसरविण्यासाठी जबाबदार असलेल्या वृत्तवाहिनीसह विविध प्लॅटफॉर्मवरील ३० हून अधिक खात्यांची ओळख पटली असून त्याची माहितीही पोलिसांना देण्यात आल्याचं सायबर सेलकडून सांगण्यात आलं आहे.