ऑनलाईन टीम / अहमदनगर :
राज्य सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईनविक्रीला परवानगी दिल्यानंतर अनेक स्तरातून सरकारवर टीकेची झोड उठत होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही सरकारच्या या निर्णयाविरोधात उद्यापासून (दि.14) आमरण उपोषणाचा निर्णय घेतला होता. मात्र, अण्णांनी हे उपोषण आता तीन महिन्यांसाठी स्थगित केले आहे. राळेगणसिद्धीचे माजी सरपंच डॉक्टर धनंजय पोटे यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पोटे म्हणाले, सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करावी की नाही? आणि अण्णा हजारे यांनी उपोषणाला बसावं की नाही याबाबत ठराव मांडण्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये ग्रामसभा झाली. या ठरावात सरकारने घेतलेल्या वाईनविक्रीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि अण्णा हजारे यांची तब्बेत पाहता त्यांनी उपोषण करू नये; असा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे अण्णांनी त्यांचं उपोषण तीन महिन्यांसाठी स्थगित केले आहे.
मार्केटमध्ये आधीच मोठय़ा प्रमाणात दारुची दुकानं आहेत, त्यात तुम्ही आणखी वाढवत आहात, तुम्हाला सर्वच लोकांना व्यसनाधीन बनवायचं आहे का?, असा प्रश्न अण्णा हजारेंनी राज्य सरकारला विचारला होता. त्यावर एक्साईज विभागाचे आयुक्त त्यांना भेटायला आले. पण त्यांच्यावर मला विश्वास नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात वाईन आमची संस्कृती नाही. तुम्ही त्याची खुल्याने विक्री करताय, ते पाहून मला या सरकारच्या राज्यात जगायची इच्छा उरलेली नाही,’ असं अण्णा म्हणाले.