प्रतिनिधी/ वाई
पालिकेच्या विशेष सभेत आज विविध विकास कामांच्या निविदा मंजूर करण्यात आल्या. यावेळी अंदाजपत्रकीय रक्कमेपेक्षा दोन ते चार टक्के कमी दराच्या सर्व निविदा आल्याने सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. कोरम अभावी सभा एक तास उशीरा सुरु झाली. त्यापूर्वी शहरातील स्वच्छतेच्या कामकाजातील दिरंगाईबद्दल नगराध्यक्ष व उपस्थित सदस्यांनी नाराजी व्यक्त करून संबंधित मुकदमांना धारेवर धरले.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी किरणकुमार मोरे यांच्या उपस्थितीत पालिकेची विशेष सभा पार पडली. सकाळी आकरा वाजता सुरुवातीला मोजकेच सदस्य उपस्थित राहिल्याने सभा काही काळ तहकूब करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष सावंत यांनी असान अँप्सवर शहरातील स्वच्छतेबाबत नागरिकांनी अपलोड केलेल्या तक्रारीची दखल घेतली जात नाही तसेच योग्य ती कार्यवाही केली जात नाही. शहर कचराकुंडी मुक्त करण्यात आले आहे. तरीही त्याठिकाणी रस्त्यावर कचरा टाकला जात आहे तसेच अनेक ठिकाणी बांधकामाचा राडारोडा दिसून येत आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर जुन्या गाडया, तसेच गँस सिलेंडरच्या गाडया उभ्या असतात. दोन दिवसात नवीन पुलाच्या बांधकामासाठी जुना कृष्णा पूल पाडण्यात येणार त्यामुळे शहरात प्रचंड वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होणार आहे. त्यावर प्रशासनाने योग्य उपाययोजना करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. याबाबत आरोग्य व बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी सिस्टिममध्ये काम करण्याची सवय लावून घ्यावी अशी सूचना केली. शहरात एकाचवेळी विकास कामे सुरु असून त्यांचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. बंदिस्त गटारांमुळे पावसाचे पाणी रस्त्यावरून वहात असल्याने नवीन समस्या उभी राहिली आहे. मागील सभेत उध्दट वागणा-या अधिका-यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या अमंलबजावणीबाबत प्रशासनाने सभागृहात अहवाल सादर करावा असे विरोधी पक्ष नेते सतीश वैराट यांनी सांगितले. पालिकेला कचरामुक्त शहर म्हणून पारितोषिक मिळाले, परंतु त्यासाठी आपण पात्र आहोत काय याबाबत आत्मचिंतन करावे असे सभागृहात सांगितले. त्यावर राजेश गुरव यांनी आक्षेप घेतला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. या पारितोषिकामुळे पालिकेला निधी उपलब्ध होणार आहे. त्यावर आपणच टिका-टिप्पणी करणे चूकीचे आहे. उलट त्यापासून प्रेरणा घेऊन शहर स्वच्छतेसाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे असे सांगितले. सदरचे मत व्यक्तिगत असल्याचे वैराट यांनी स्पष्ट केल्यानंतर या वादावर पडदा पडला. विकास कामांच्या निविदा कमी दराच्या आल्याने तसेच तांत्रिक सल्लागारांची फी दोन टक्के कमी केल्याबद्दल नगराध्यक्षांचे अभिनंदन करणारा ठराव यावेळी मांडण्यात आला. यावेळी भारत खामकर, महेंद्र धनवे, प्रदिप चोरगे, संग्राम पवार यांनी चर्चेत सहभाग घेतला. तर किशोर बगुल, स्मिता हगीर, सुमेय्या इनामदार, सुनीता चक्के या महिला सदस्या उपस्थित होत्या. कार्यालय अधिक्षक नारायण गोसावी यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. सभेत रविवार पेठ, रामडोह आळी, नावेचीवाडी, गणपती आळी या भागातील बंदिस्त गटार बांधकाम, बोळ कॉंक्रीटीकरण, रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे अशा विकास कामांच्या तसेच विविध विकास कामांसाठी तांत्रिक सल्ला घेण्यासाठी व्यवस्थापन सल्लागाराची नेमणुक करण्यासाठी तसेच वसुली विभागाकडील करमुल्याकनासाठी तांत्रिक सर्व्हेक्षण करून मालमत्तेची माहिती गोळा करण्यासाठी तसेच मुल्याकंनासाठी संगणक आज्ञावली पुरविणे यासाठी मागविण्यात आलेली निविदा मंजूर करण्यात आली.