करडवाडी / प्रतिनिधी
भुदरगड व राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसराला जोडणारा रस्ता पुन्हा खचल्याने या परिसरातील वाहतूक बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. कोटयावधी रुपये खर्च करून तयार केलेल्या या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे सहसचिव विश्वजित देसाई, शशिकांत पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
भुदरगड तालुक्यातून नितवडे मार्गे राधानगरी तालुक्यातील वाकीघोल परिसरात जाणारा हा मुख्य मार्ग आहे. या परिसरातील आडोली, सावर्डे, गावठाण,वडाचीवडी,हेळेवाडी आदी गावातील लोक बाजार,वैद्यकीय सुविधेसाठी तसेच शिक्षणासाठी अनेक विध्यार्थी कडगाव या मुख्य बाजारपेठेच्या ठिकाणी याच मार्गाने येत असतात. गत वर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे एरंडपे जवळ १०० मीटर अंतराचा रस्ता तुटून गेला होता. यामुळे वाकीघोल परिसरातील १५ ते २० गावांना जाणारी वाहतूक २ ते ३ महिने बंद होती . या रस्त्याच्या कामासाठी अतिवृष्टी भुस्कलनातून १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. यामुळे रस्त्याच्या कामाकरिता गती मिळाली, परंतु तब्बल सात महिने रस्त्याचे काम सुरू होते. ठेकेदाराने केलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे यावर्षीच्या पहिल्या पावसातच रस्त्याला भेगा पडून रस्ता खचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सदर कामाची सखोल चौकशी व्हावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला आहे.
या संबंधी शाखा अभियंते भोपळे यांनी रस्त्याच्या झालेल्या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची दुरुस्ती करून घेतली जाईल असे सांगितले.