प्रतिनिधी/कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ महोत्सवात देशभरातील अनेक मान्यवर प्रकाशकांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या स्टॉलवर अभ्यासक्रमातील अनेकविध विषयांच्या संदर्भग्रंथांसह महत्त्वाच्या अवांतर वाचनासाठीही हजारो पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथमहोत्सवातून वाचसंस्कृती वाढते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या बुकस्टॉलला भेट द्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या 56व्या दीक्षान्त समारंभाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या वतीने राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहासमोरील आमराईमध्ये भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या दोन दिवसीय प्रदर्शनाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ग्रंथ प्रदर्शनात सुमारे 33 स्टॉल मांडण्यात आले आहेत. फित कापून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस. आर. रंगनाथन आणि बॅ. बाळासाहेब खर्डेकर यांच्या छायाचित्रांना कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्व स्टॉलधारक, प्रकाशकांना भेट देवून स्वागत केले.
कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. भारती पाटील, डॉ. ए. एम. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन, उपग्रंथपाल डॉ. डी. बी. सुतार, सहाय्यक ग्रंथपाल डॉ. पी. बी. बिलावर, डॉ. एस. व्ही. थोरात, इंटरनेट विभागाचे समन्वयक डॉ. मिलींद जोशी, परीक्षा विभागाचे उपकुलसचिव एन. एम. आकुलवार, सहाय्यक कुलसचिव निवास माने यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मार्केटिंग व व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष अनुभव मिळावेत आणि त्यांच्यातून चांगले उद्योजक-व्यावसायिक घडावेत, यासाठी कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राने एमबीए युनिटच्या सहकार्याने ‘ट्रेड फेअर स्टार्टअप-2020’चे आयोजन केले आहे. याअंतर्गत एकूण 10 स्टॉल घेण्यात आले असून त्यातील आठ विविध खाद्यपदार्थांचे तर सेंद्रिय गूळ आणि कोल्हापुरी चप्पलचा प्रत्येकी एक स्टॉल आहे. यात एमबीए, कॉमर्स, रसायनशास्त्र आणि फूड टेक्नॉलॉजीच्या सुमारे 40 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला आहे.
या फेअरचे नियोजन समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, श्रीमती डॉ. इंगवले व कौशल्य विकास अधिकारी महेश चव्हाण यांनी केले आहे.