‘शब्दब्रम्ह’कडून मुक्त वाचनालयाचे उद्घाटन
पिंपरी / प्रतिनिधी :
सध्याचे युग हे मोबाईलचे असले, तरी या माध्यमाच्या अतिआहारी जाणे योग्य नाही. वर्तमानपत्रे, नियतकालिके वा ग्रंथवाचनातच खऱया अर्थाने माणूस घडविण्याचे सामर्थ्य आहे, असे विचार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उद्धव साळवे यांनी येथे व्यक्त केले.
चिखली, मोरेवस्ती येथील शब्दब्रम्ह काव्य योगसंस्कार व विविधांगी सेवा संस्थेच्या वतीने टाटा मेमोरिअलच्या बायोकेमिस्ट्री विभागाचे दिवंगत अधिकारी व रसिक वाचक सुरेश कृष्णा जाधव यांच्या स्मृत्यर्थ योगेश्वर केदारनाथ सर्वधर्मसमभाव शिवमंदिराच्या परिसरात साळवे यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. संस्थेचे प्रमुख प्रभाकर चव्हाण, शाहीर वसंत घाग, स्मिता जाधव, सरिता चव्हाण, वैशाली कुंजीर, इंदुमती कांबळे, पूजा फडतरे, ज्ञानेश्वर गवस, चंद्रकांत आंब्रे व अन्य उपस्थित होते.
प्रभाकर चव्हाण म्हणाले, लहान वयापासूनच मुलांवर वाचनाचे संस्कार व्हायला हवेत. वाचनाने मुले बहुश्रुत होतात. भाषा, सामान्य ज्ञानाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी वर्तमानपत्रे वाचालयाच हवीत. मोबाईलसारख्या माध्यमाला मर्यादा असून, मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांवर दुष्परिणाम होत असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे वाचन कसे वाढवता येईल, याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक वर्तमानपत्राची वेगळी शैली असते. त्यात माहितीचा खजिना असतो. तो मुलांना खुला करून दिला पाहिजे. शब्दब्रम्हचा हा उपक्रम त्यादृष्टीनेच असून, मुलांसह सर्वांनीच याचा लाभ घ्यावा.
घोरवडेश्वरला थोरांची जयंती साजरी
दरम्यान, सालाबादप्रमाणे यंदाही शब्दब्रम्हकडून घोरवडेश्वर येथे निसर्गाच्या सान्निध्यात स्वामी विवेकानंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते राहुल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात शब्दब्रम्हच्या मुलांनी विविध कविता सादर करीत वातावरण भारावून टाकले. देशासाठी अतुलनीय योगदान दिलेल्या सर्व थोर व्यक्तींच्या कार्यातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, अशी अपेक्षा वाघमारे यांनी या वेळी व्यक्त केली. अखिलेश उपाध्याय व अन्य या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची व्यवस्था गाथा चव्हाण व सरिता उपाध्याय यांनी पाहिली.