ऑनलाइन टीम / पुणे :
उत्तम पुस्तकांच्या वाचनातून मानवी जीवन घडत असते. ‘ज्ञानदान: एक संस्कार चळवळ’ हा उपक्रम ज्ञान आणि संस्काराचा संगम आहे. कारण वाचन संस्कार हा ज्ञानदानाचाच संस्कार आहे, , असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत न.म.जोशी यांनी व्यक्त केले.
ज्ञान फाऊंडेशनतर्फे साने गुरुजींच्या वाढदिवसाचे निमित्त साधुन युवा पिढी संस्कारक्षम आणि पराक्रमी होण्यासाठीचा शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून ‘ज्ञानदान एक संस्कार चळवळ’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात साने गुरूजीलिखित ‘श्यामची आई’ आणि संदिप तापकीरलिखित ‘छत्रपती श्री शिवराय’ ही पुस्तके इयत्ता चौथी ते सातवीच्या वर्गांसाठी तुकडीनिहाय १६ शाळांना सस्नेह भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत डॉ. अ.ल. देशमुख आणि आरोग्यसेनेचे अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य ज्ञान फौंडेशनचे अध्यक्ष मनोहर कोलते, अधिक्षक अभियंता राजेंद्र पवार, भागवत थेटे, विश्वस्त अमर राजपूत, सचिन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना न.म. जोशी म्हणाले की, या चळळीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ‘श्यामची आई’ आणि ‘छत्रपती श्री शिवराय’ या पुस्तकातील विचार शिक्षकांनी मुलांमध्ये रूजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
यावेळी बोलताना डॉ. अ.ल. देशमुख म्हणाले की, कोणतीही शिक्षण चळवळ किंवा वाचन संस्कृती शिक्षकांशिवाय वाढणार नाही. आज शाळेतील मुलांमध्ये बेशिस्तीचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. अशा परिस्थतीत साने गुरूजी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने विद्यार्थ्यांमध्ये स्थिरता प्राप्त होईल. त्यासाठी शिक्षकांनी मुलांमध्ये ‘श्यामची आई’ आणि ‘छत्रपती श्री शिवराय’ या पुस्तकातील विचार रूजवले पाहिजे. त्यासाठी मुलांना अगोदर पुस्तक कसे वाचावे हे शिकवणे गरजेचे आहे.